महत्वाची बातमी : बोर्डाला काढावी लागणार दहावी-बारावीची मेरिट लिस्ट
आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC-HSC Board) दहावी व बारावी परीक्षेची गुणवत्ता यादी (SSC-HSC Meritlist) जाहीर करण्याची पध्दत काही वर्षांपुर्वीच बंद करण्यात आली आहे. पण आता राज्य मंडळासह विभागीय मंडळे तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळालाही (CBSE) मेरिट लिस्ट काढावी लागणार आहे. राज्य सरकारने अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस योजना जाहीर केली आहे.
आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, नामांकीत शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दोन्ही मंडळांच्या गुणवत्ता यादीत प्राविण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणारी पाच मुले व पाच मुली तसेच राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये प्रथम येणारी प्रत्येकी तीन मुले व तीन मुलींना प्रोत्साहनपर बक्षिस दिले जाणार आहे.
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार; शाळांवर सोपवली जबाबदारी
राज्य शासनाकडून या योजनेचा जीआर काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्य मंडळ व विभागीय मंडळाला इयत्ता दहावीची पहिली पाच मुले व मुलींची गुणवत्ता यादी काढावी लागणार आहे. तसेच इयत्ता बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेनुसार प्रत्येक पाच मुला व मुलींची गुणवत्ता यादीही काढावी लागेल. या विद्यार्थ्यांना पहिला ते पाचव्या क्रमांकानुसार अनुक्रमे ३० हजार, २५ हजार, २० हजार, १५ हजार आणि १० हजार बक्षिसे दिली जाणार आहेत.
नामांकित शाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधून सीबीएसई मध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे प्रत्येकी पाच मुले व पाच मुलींनाही स्वतंत्रपणे बक्षिसे दिली जाणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठीही बक्षिसाची रक्कम सारखीच असेल.
इयत्ता अकरावीची दुसरी निवड यादी जाहीर; प्रवेश निश्चित करण्यासाठी महत्वाच्या टीप्स
राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांनाही इयत्ता दहावी व बारावीची स्वतंत्र गुणवत्ता यादी काढावी लागणार आहे. त्यातून दहावीची पहिली तीन मुले व पहिल्या तीन मुली तर इयत्ता बारावीच्या तिन्ही शाखांनुसार प्रत्येकी तीन मुले व मुली अशा एकुण ३४ विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जाणार आहे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर सर्वांना त्या क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम देण्यात यावी, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. योजनेची अंमलबजावणी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.