पालकांच्या वाढत्या अपेक्षाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
कोटा शहरातून सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या समोर येत आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहता पोलिसांनी एक वेगळे पथक तयार केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पालकांच्या (Parents) वाढत्या अपेक्षांमुळेच देशात विद्यार्थी आत्महत्येचे (Students Suicide) प्रमाण वाढत आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पालकांचे कान उपटले आहेत. कोटा (Kota) शहरात यावर्षी तब्बल २४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी कोटासह देशभरातील कोचिंग सेंटर्स नियंत्रित करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या पालकांना जबाबदार ठरवले आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती म्हणाले, "कोचिंग सेंटर्समुळे या आत्महत्या होत नसून पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात कोचिंग सेंटर्सची नव्हे तर पालकांची चूक दिसून येत आहे."
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे कोचिंग सेंटर्सना दिलासा मिळाला आहे. सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना सल्ला दिला आहे की, ते ही याचिका घेऊन उच्च न्यायालयात जाऊ शकतात. कारण या याचिकेत ज्या आत्महत्यांचा उल्लेख केला आहे, त्यापैकी अनेक प्रकरणे ही राजस्थानच्या कोटा शहरातील आहेत.
कोटा शहरातून सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या समोर येत आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहता पोलिसांनी एक वेगळे पथक तयार केले आहे. या पथकातील कर्मचारी सातत्याने विद्यार्थ्यांशी बोलत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. तणावात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोलिसांनी एक हेल्पलाईनदेखील सुरू केली आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.