म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक राख्यांनी रक्षाबंधन साजरे
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार करून शाळेच्या आवारातील झाडांना तसेच पोलीस बंधू-भगिनींना राख्या बांधत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. प्रेम, बंधुभाव, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगण्यात आले. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि परस्पर संरक्षणाचे प्रतीक असलेल्या या सणाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व आकर्षक पर्यावरणपूरक राख्या स्वतः तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्यात आली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी पोलीस बंधू-भगिनींना राख्या बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस श्री. अविनाश भागवत, श्री. शंकर निंबाळकर, श्री. अजित भाग्यवंत, सौ. रेशमा काळे, सौ. वनिता कदम व सौ. स्वाती पंडित यांना विद्यार्थ्यांनी प्रेमाने राख्या बांधल्या.

यावेळी पोलीस बंधू-भगिनींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींशी बोलू नये, त्यांच्या सोबत कुठेही जाऊ नये तसेच अनोळखी व्यक्तींनी दिलेला खाऊ किंवा कोणतीही वस्तू स्वीकारू नये, असा सुरक्षिततेचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील झाडांनाही पर्यावरणपूरक राख्या बांधल्या. “झाडे आपले मित्र आहेत, त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. प्रेम, बंधुभाव, सामाजिक जाणीव, कृतज्ञता, पर्यावरणप्रेम आणि सुरक्षितता या मूल्यांची रुजवण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजय पुरोहित, महामात्र मा. डॉ. गोविंद कुलकर्णी तसेच संस्थेचे सर्व मान्यवर सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.