एमपीएसी परिक्षेत राज्यात पहिला आलेल्या अधिकाऱ्याचा बीडमध्ये संशयास्पद मृत्यू
बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे केवळ प्रशासकीय वर्तुळच नव्हे, तर राज्यातील हजारो विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सचिन जाधवर यांचा मृतदेह एका कारमध्ये आढळून आला असून, घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत गूढ निर्माण झाले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बीड जिल्हा पुन्हा (Beed Crime News) एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्पर्धा परीक्षा विश्वातील एक उत्तुंग नाव, २०१२ च्या 'एमपीएससी' (MPSC) परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवणारे आणि इंग्रजी व्याकरणाचे ख्यातनाम लेखक आणि आयकर विभागात कार्यरत असलेले सचिन नारायण जाधवर (Income Tax Officer Sachin Narayan Jadwar) यांचा संशयास्पद मृत्यू (The death is suspicious) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे केवळ प्रशासकीय वर्तुळच नव्हे, तर राज्यातील हजारो विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सचिन जाधवर यांचा मृतदेह एका कारमध्ये आढळून आला असून, घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, ही आत्महत्या आहे की हत्या, या दिशेने सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
हेही वाचा - एमडी. प्रवेशाच्या नावाखाली डाॅक्टरांची लाखो रुपयांची फसवणूक, आंतरराष्ट्रीय सराईत गुन्हेगार जाळ्यात
सविस्तर माहिती अशी की, सचिन जाधवर हे रात्री घराबाहेर गेले होते, परंतु ते वेळेवर परतले नाहीत. बराच वेळ होऊनही त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या पत्नीने चिंताग्रस्त होऊन काल सकाळी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि स्थानिक माहितीनुसार, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निर्जन ठिकाणी त्यांची कार उभी असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता, कारमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आला. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा अशा अवस्थेत मृतदेह सापडल्याने संपूर्ण पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली.
सचिन जाधवर यांची ओळख केवळ एक सरकारी अधिकारी म्हणून नव्हती, तर ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक होते. २०१२ मध्ये एमपीएससीमध्ये राज्यात प्रथम येऊन त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. विशेषतः इंग्रजी व्याकरण या विषयावर त्यांचे प्रभुत्व अफाट होते. त्यांनी लिहिलेली इंग्रजी व्याकरणाची पुस्तके आजही राज्यातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी आधारस्तंभ मानली जातात.
एक अत्यंत संयमी, अभ्यासू आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. अशा उच्चविद्याविभूषित व्यक्तीचा असा करुण अंत व्हावा, यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या विद्यार्थी वर्गामध्ये शोककळा पसरली आहे. बीड ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास सुरू आहे. हा घातपात आहे की आत्महत्येचे पाऊल, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. पोलीस अधीक्षक स्तरावरून या तपासावर देखरेख ठेवली जात आहे.