पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यात सहभागी होण्याचे हमीपत्र द्या, उमेदवारांना सूचना
एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून आपण राहात असलेल्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याबाबत हमीपत्र द्यावे, गृह खात्याच्या सुचना.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मागील दोन महिन्यापासून पोलीस भरतीची (Police Recruitment) प्रक्रिया पार पडत आहेत. या भरती प्रक्रियेत पोलीस प्रशासनाकडून (Police Administration) वेळोवेळी काही सुचना देण्यात येत आहेत. त्यात आता पोलीस भरतीतील उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून सहभागी होता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात (Office of the Superintendent of Police) त्याबाबत हमीपत्र द्यावे (Guarantee should be given), अशी सूचना गृह खात्याने (Notice Home Department) दिली आहे. हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत १७ मे पर्यंत देण्यात आली आहे.
राज्यात सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अर्ज भरले आहेत, असे अर्ज पडताळणी वेळी गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे. उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. यातून प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते. असा धोका टाळण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून तसे हमीपत्र घेण्यात येणार आहे.
यासाठी एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यावे, अशी सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. १७ मे पर्यंत हमीपत्र जमा करा, अन्यथा त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.