शाश्वत विकासासाठी कौशल्यपूर्ण आणि अनुभवात्मक शिक्षणाची गरज: डॉ. पंडित विद्यासागर

शाश्वत विकासासाठी केवळ ज्ञान असून चालणार नाही, तर त्यासाठी लागणारे कौशल्य असलेले मनुष्यबळ निर्माण करणे ही महाविद्यालयांची जबाबदारी आहे.

शाश्वत विकासासाठी कौशल्यपूर्ण आणि अनुभवात्मक शिक्षणाची गरज: डॉ. पंडित विद्यासागर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार उच्च शिक्षणाची उद्दिष्टे बदलणे काळाची गरज आहे. केवळ पदव्या देण्यापेक्षा सामाजिकदृष्ट्या जबाबदार, कौशल्यपूर्ण आणि पर्यावरणाविषयी जागरूक नागरिक घडवणे, हेच उच्च शिक्षणाचे खरे ध्येय असले पाहिजे," असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

शिरूर येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे, सी. टी. बोरा महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास" या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंडित विद्यासागर बोलत होते. त्यावेळी शिरूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. धरमचंदजी फुलपगार, शिरूर शिक्षण मंडळाचे सचिव मा. श्री. नंदकुमार निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, IISER चे संचालक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातु, आंध्र प्रदेशातील, विक्रमा सिम्हापुरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) अल्लम श्रीनिवास राव, मध्यप्रदेशातील मदन मोहन मालवीय टीचर ट्रेनिंग सेंटर, एच. एस. गौर विद्यापीठ, सागर, चे संचालक, डॉ. आर. टी. बेदरे , उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव आदी उपस्थित होते.

पंडित विद्यासागर यांनी शाश्वत विकासाच्या जागतिक ध्येयांवर (SDGs) प्रकाश टाकला. गरिबी निर्मूलन, भूकमुक्ती, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता आणि स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता यांसारख्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. "शाश्वत विकासासाठी केवळ ज्ञान असून चालणार नाही, तर त्यासाठी लागणारे कौशल्य असलेले मनुष्यबळ निर्माण करणे ही महाविद्यालयांची जबाबदारी आहे, असे ही ते म्हणाले.

पारंपारिक 'खडू आणि फळा' या पद्धतीपेक्षा नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. आपल्याला नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या प्राचीन भारतीय संस्थांचा वारसा आहे, जिथे केवळ ज्ञान नाही तर नीतिमत्ता आणि कौशल्येही शिकवली जात असत. तोच वारसा पुढे नेण्यासाठी 'अनुभवात्मक शिक्षण' (Experiential Learning) ही आजची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

गेल्या तीन दशकांपासून सी. टी. बोरा महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल जवळून पाहिलेले डॉ. विद्यासागर यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाप्रती असलेल्या कटिबद्धतेचे कौतुक केले. राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि व्यावहारिक क्षमता विकसित करणे, हेच शाश्वत भविष्याचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच महाविद्यालयाच्या 'ग्रीन कॅम्पस' उपक्रमांची माहिती दिली, तर डॉ. एस. बी. भोईटे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी परिषदेच्या 'शोधनिबंध संग्रहाचे' प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पहिल्या दिवसी आंध्र प्रदेशातील विक्रम सिंहापुरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) अल्लम श्रीनिवास राव यांनी आपल्या बीजभाषणात नालंदा आणि तक्षशिला या प्राचीन भारतीय विद्यापीठांचा संदर्भ देत भारताच्या शैक्षणिक वारशाचा गौरव केला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातु यांनी शाश्वत विकासाला 'चिरंतन' ही संज्ञा दिली. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था हाच शाश्वत विकासाचा खरा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच डॉ. आर. टी. बेदरे यांनी ज्ञानेश्वरीतील 'पसायदान' आणि पर्यावरणाचा समतोल यांचा सुंदर संबंध जोडला.

नंदकुमार निकम यांनी आपल्या भाषणात उच्य शिक्षण आणि शाश्वत विकास कसा महत्वाचा आहे हे आपल्या भाषणातून व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मा. श्री. धरमचंदजी फुलपगार यांनी शिरूर शिक्षण मंडळाची शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनाप्रती असलेली कटिबद्धता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अतुल जेठे यांनी केले. दुपारच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या राज्यातील आणि इतर विद्यापीठातील संशोदाकानी पेपर आणि पोस्टर सादारीकरण केले. 

दुसऱ्या दिवशी नामवंत आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी “उच्च शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची भूमिका आणि भविष्यातील संधीं” वर प्रकाश टाकला आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे, वरिष्ठ सल्लागार डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' आणि शाश्वत विकास यावर सविस्तर भाष्य केले. "उच्च शिक्षण बदलले, तरच राष्ट्र बदलेल," असे प्रतिपादन करत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत विकास ध्येयांची (SDGs) माहिती दिली. त्यांनी पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि समाज या तीन स्तरांवरील शाश्वततेवर भर दिला. महाविद्यालयांनी केवळ परीक्षाभिमुख न राहता 'इन्स्टिट्यूशनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (ISR) अंतर्गत समाजाशी जोडले जावे, असे त्यांनी सांगितले. 

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव, समन्वयक डॉ. अतुल जेठे, आयोजन सचिव डॉ. सुनील भोईटे, डॉ. रमेश भिसे आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुनील भोईटे यांनी दोन दिवसांतील विविध सत्रांचा आढावा घेतला. तसेच सहभागी संशोधक आणि विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजन समितीचे कौतुक केले आणि ही परिषद शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करणारी ठरली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल जेठे यांनी केले. या परिषदेला देशभरातून आणि राज्यातून अनेक संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.