नीट गोंधळामुळे अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेश प्रक्रिया रखडले, विद्यार्थी व पालक चिंतेत

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यावर्षी भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित आणि भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-जीवशास्त्र या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे नियोजन केले होते.

नीट गोंधळामुळे अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेश प्रक्रिया रखडले, विद्यार्थी व पालक चिंतेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी २०२६) मधील प्रश्नपत्रिका फुटीच्या (NEET Question Paper Leak Scandal) गोंधळाचा परिणाम आता महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या (Engineering and Pharmacy Courses) प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. नीट निकाल जाहीर होईपर्यंत केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या फेरी लांबणीवर (Admission Round Postponed) पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील नऊ अभियांत्रिकी शाखांसाठी नीट गुणांचा वापर केला जातो. या शाखा म्हणजे कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, चर्म अभियांत्रिकी, पॅकेजिंग अभियांत्रिकी, औषध अभियांत्रिकी, मुद्रण अभियांत्रिकी, फॅशन तंत्रज्ञान आणि कापड रसायनशास्त्र. याशिवाय फार्मसी अभ्यासक्रमातील १५ टक्के अखिल भारतीय कोट्याच्या जागांसाठीही नीट गुण अनिवार्य आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीटची पुनः परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्याचे जाहीर केले असून, निकाल जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होणार आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यावर्षी भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित आणि भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-जीवशास्त्र या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे नियोजन केले होते. केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या जून महिन्याच्या अखेरीस सुरू करून पूर्व-कोविड काळातील वेळापत्रक पुनर्स्थापित करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु नीट प्रकरणामुळे संपूर्ण नियोजन बिघडले आहे.” इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील, मात्र नीटवर आधारित अभ्यासक्रमांसाठी नीट निकालाची प्रतीक्षा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. 

अनेक विद्यार्थी नीट परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या आधारे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वळतात. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशालाही विलंब होणार असल्याने पालक नाराज झाले आहेत. महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक सत्र जुलै-ऑगस्टऐवजी उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी शैक्षणिक वर्षावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.