पोलीस भरती घोटाळा!खाजगी पुस्तकातील८५ प्रश्न आल्याने SRPF परीक्षा रद्द,पुनर्परीक्षा २४ मे रोजी

नवीन वेळापत्रकानुसार एसआरपीएफ गट 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 24 मे 2026 रोजी दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड येथे आयोजित करण्यात येणार आहे.

पोलीस भरती घोटाळा!खाजगी पुस्तकातील८५ प्रश्न आल्याने SRPF परीक्षा रद्द,पुनर्परीक्षा २४ मे रोजी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत मोठा वाद समोर आला आहे. राज्य राखीव पोलीस दल (Daund SRPF Recruitment) गट क्रमांक ५, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी २ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली लेखी परीक्षा अखेर रद्द (Written Exam Cancelled) करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंचातील (Paper Practice Question Set) पुस्तकातून जसेच्या तसे घेण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. तसेच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर ही परीक्षा रद्द करून २४ मे रोजी पुनर्परीक्षा (Re-examination date announced) घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 

हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 4 मे रोजी सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांना आता २४ मे रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अधिकृत सूचना आणि वेळापत्रकासाठी SRPF किंवा महाराष्ट्र पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन वेळापत्रकानुसार एसआरपीएफ गट 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 24 मे 2026 रोजी दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड येथे आयोजित करण्यात येणार आहे. पुनर्परीक्षेमुळे उमेदवारांना न्याय मिळेल आणि भरती प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एसआरपीएफ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात माध्यमांमधून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतल्याचं नमूद केलं आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.