मुंबई विद्यापीठ : चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचे पर्याय खुले, पदवीनंतर थेट ‘पीएचडी’ला मिळणार प्रवेश

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनक्षम बनवणे आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. सन्मान संशोधनासह अभ्यासक्रमामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाशिवाय थेट पीएचडीचा मार्ग खुले होईल,” असे त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठ : चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचे पर्याय खुले, पदवीनंतर थेट ‘पीएचडी’ला मिळणार प्रवेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) शैक्षणिक परिषदेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP -2020) अंतर्गत चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (4 year degree program) चौथ्या वर्षाचे मार्गदर्शक नियम मंजूर केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ७.५ सीजीपीए गुण (Students awarded a CGPA of 7.5.) मिळाल्यास पदवी नंतर थेट पीएचडीसाठी प्रवेश मिळणार आहे.

विद्यापीठाने २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आणि २०२७-२८ पासून इतर महाविद्यालयांमध्ये ही योजना राबवण्याचे नियोजन केले आहे. तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी चौथ्या वर्षात प्रवेश घेऊ शकतील. ऑनर्स अभ्यासक्रमात प्रमुख विषयातील सखोल अध्ययनासोबत चार क्रेडिट्सचा प्रत्यक्ष अनुभव (इंटर्नशिप) समाविष्ट असेल. तर ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रमात बाराव क्रेडिट्सचा संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध पूर्ण करावा लागेल. एकूण १६० ते १७६ क्रेडिट्स पूर्ण करून पदवी प्रदान केली जाईल.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनक्षम बनवणे आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. सन्मान संशोधनासह अभ्यासक्रमामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाशिवाय थेट पीएचडीचा मार्ग खुले होईल,” असे त्यांनी सांगितले.

ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रमासाठी किमान ७.५ सीजीपीए गुण आवश्यक आहेत. फक्त पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांनाच सन्मान पर्याय आणि संशोधन केंद्र असणाऱ्या महाविद्यालयांनाच संशोधन पर्याय देण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०२२ च्या नियमांनुसार ७५ टक्के किंवा ७.५ सीजीपीए गुण मिळालेल्या चार वर्षांच्या पदवीधारकांना थेट पीएचडीसाठी पात्रता प्राप्त होईल. विद्यापीठ प्रवेश परीक्षा किंवा राष्ट्रीय पात्रता परीक्षेद्वारे प्रवेश शक्य आहे. आरक्षण श्रेणींसाठी पाच टक्के सूट राहील.

हा अभ्यासक्रम बहु-प्रवेश आणि बहु-निर्गम सुविधा देतो. तीन वर्षांनंतर विद्यार्थी बाहेर पडू शकतात किंवा संशोधनाकडे वळू शकतात. यामुळे वेळेची बचत होईल आणि संशोधन संस्कृतीला चालना मिळेल. मात्र, सर्व महाविद्यालयांमध्ये संशोधन पर्याय उपलब्ध नसेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची निवड काळजीपूर्वक करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.