अकरावी प्रवेश: ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील अडथळा झाला दूर
पहिल्या फेरीतून प्रवेश घेण्यासाठी 3 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यातच ई डब्ल्यू एस आणि एनसीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश निश्चित करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांकडे आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. मात्र त्यावर शिक्षण विभागाने पर्याय शोधला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र सद्यस्थितीत पहिल्या नियमित फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या एनसीएल आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करता येत नसल्यामुळे प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. त्यावर आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदत द्यावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेतील हा अडथळा दूर झाला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतून 5 लाख 74 हजार 945 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यात आले आहे. दोन जून पर्यंत 2 लाख 1 हजार 106 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मात्र अजूनही 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश म्हणूनही महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित केलेला नाही.

पहिल्या फेरीतून प्रवेश घेण्यासाठी 3 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यातच ई डब्ल्यू एस आणि एनसीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश निश्चित करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांकडे आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. मात्र त्यावर शिक्षण विभागाने पर्याय शोधला आहे.
2026-27 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करतेवेळी एनसीएल /ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र नसल्यास विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदत देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याबाबत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना कळविण्यात यावे, अशा सूचना राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिले आहेत.