पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास योजना;महापालिकेची मोठी घोषणा
महानगरपालिका शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना बसपास पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. तर शासनमान्य खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना बसपासच्या एकूण शुल्कापैकी २५ टक्के रक्कम चलनाद्वारे महानगरपालिका कोषागारात भरावी लागणार असून, त्यानंतर पीएमपीएमएलमार्फत बसपास वितरित केला जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) हद्दीतील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी (Students of classes 5 to 10) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये मोफत बसपास योजना (Free Bus Pass Scheme) राबविण्यास महापालिका सभेने मंजुरी (Approved by the Municipal Corporation meeting) दिली आहे. या निर्णयामुळे महानगरपालिका शाळांसह शासनमान्य खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घर असा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च कमी (Reduced travel expenses for students) करण्याबरोबरच नियमित शाळेत उपस्थिती वाढविणे (Increasing school attendance) आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या योजनेनुसार महानगरपालिका शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना बसपास पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. तर शासनमान्य खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना बसपासच्या एकूण शुल्कापैकी २५ टक्के रक्कम चलनाद्वारे महानगरपालिका कोषागारात भरावी लागणार असून, त्यानंतर पीएमपीएमएलमार्फत बसपास वितरित केला जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षातील किमान ७५ टक्के उपस्थिती आवश्यक असून, विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेचे अंतर किमान दोन किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक असणे बंधनकारक आहे.
अर्ज प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी निर्धारित नमुन्यातील अर्जासोबत रहिवासी पुरावा, आधार कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा असलेले ओळखपत्र, संबंधित शाळेचे प्रमाणपत्र तसेच दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी पीएमपीएमएलच्या अधिकृत डेपोमध्ये आवश्यक शुल्क भरून त्याची पावती अर्जासोबत सादर करावी. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर बसपास तयार करून त्यांचे वितरण ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. या पासची वैधता ३० जून २०२७ पर्यंत राहणार आहे.
महापालिकेने सर्व मुख्याध्यापकांना पात्र विद्यार्थ्यांची यादी वेळेत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांनी अर्जांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव वेळेत पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. पालकांनीही मुदतीत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
महापौर रवि लांडगे यांनी या निर्णयाचे स्वागत करत, आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबांवरील प्रवासाचा भार कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असे सांगितले. तसेच पात्र विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याला योजनेपासून वंचित राहू देऊ नये, यासाठी शाळा प्रशासन, पालक आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियमित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.