महावितरणकडून ऐनवेळी परीक्षा पद्धतीमध्ये बदल, लाखो परीक्षार्थींमध्ये गोंधळ
महावितरण कंपनीकडून २०२३ मध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आला. तेव्हापासून उमेदवार परीक्षेचा अभ्यास करत आहेत. मात्र, त्यावेळी दिलेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये महावितरणने अचानक बदल केला. २० मेपासून परीक्षा सुरू होणार असताना अचानक ११० गुणांसाठी असलेल्या तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम आता ५० गुणांचा केला आहे, तर परीक्षेचा वेळही दोन तासांवरून ७५ मिनिटे करण्यात आल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (Maharashtra State Electricity Distribution Company) सरळसेवा भरती अंतर्गत ५ हजार ३४७ ‘विद्याुत सहाय्यक’ पदासाठी(Recruitment for 5 Thousand 347 ‘Electrical Assistant’ posts) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीमध्ये ऐनवेळी बदल (Changes in exam pattern) करण्यात आल्याने राज्यातील लाखो उमेदवार गोंधळात पडल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन वर्षापासून उमेदवार परीक्षेची तयारी करत असून आता काही दिवसांवर पेपर आहेत अशा परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीकडून घेण्यात आलेल्या हा निर्णय अनेक उमेदवारांच्या जिव्हारी लागला आहे.
महावितरण कंपनीकडून २०२३ मध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आला. तेव्हापासून उमेदवार परीक्षेचा अभ्यास करत आहेत. मात्र, त्यावेळी दिलेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये महावितरणने अचानक बदल केला. २० मेपासून परीक्षा सुरू होणार असताना अचानक ११० गुणांसाठी असलेल्या तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम आता ५० गुणांचा केला आहे, तर परीक्षेचा वेळही दोन तासांवरून ७५ मिनिटे करण्यात आल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.
जाहिरातीमध्ये तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञानकरिता ११० गुणांसाठी ५० प्रश्न देण्यात येणार होते. याशिवाय तर्कशक्ती ४० प्रश्न, संख्यात्मक अभियोग्यता २० प्रश्न, मराठी भाषा २० प्रश्न दिले जाणार होते. एकूण १५० गुणांसाठी १३० प्रश्न दिले जाणार होते. परंतु, नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवीन प्रसिद्धीपत्रकानुसार, तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान ५० गुणांसाठी २५ प्रश्न दिले जाणार आहे. याशिवाय १२० मिनिटांची परीक्षा ७५ मिनिटांची केली आहे.
महावितरणकडून डिसेंबर २०२३ मध्ये ‘विद्युत सहाय्यक’ या तीन वर्षांच्या कंत्राटी पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. तीन वर्षांच्या कामगिरीनंतर या उमेदवारांना महावितरणमध्ये नियमित केले जाते. शिवाय अनेक वर्षांनंतर ५ हजार ३४७ एवढ्या मोठ्या पदांसाठी जाहिरात आल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला. आणि परीक्षेच्या तयारीला लागले, जवळपास दीड वर्षापासून अभ्यास केलेला असताना अचानक अभ्यासक्रम परीक्षा पद्धतीमध्ये बदल केल्याने अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.
जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तेव्हा तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम ११० गुणांचा देण्यात आला होता. त्या पद्धतीने गेली दोन वर्षापासून अभ्यास करत आहे. त्यामुळे ऐनवेळी परीक्षा पद्धतीमध्ये बदल केल्याने हा माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा निर्णय आहे. हा बदल नेमका का करण्यात आला त्याबाबत महावितरण कंपनीकडून अद्याप सांगण्यात आले नाही.
- परीक्षार्थी उमेदवार