प्रतीक्षा संपली! पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास २७ मे २०२६ पर्यंत शाळेच्या लॉगिनद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नाव, आडनाव, आई-वडिलांचे नाव आदी माहितीत दुरुस्ती करायची असल्यासही त्याच मुदतीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Maharashtra State Examination Council) इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा (5th and 8th Class Scholarship Examinations) अंतरिम निकाल आज जाहीर (Results Announced) केला आहे. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षांसोबतच शासकीय विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती विद्यानिकेतन यांच्या प्रवेश परीक्षांचे निकालही एकत्रितपणे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक (Commissioner Anuradha Oak) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉगिनद्वारे उपलब्ध झाला आहे. तर पालक आणि विद्यार्थी www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळांवरून निकाल पाहू शकतात.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास २७ मे २०२६ पर्यंत शाळेच्या लॉगिनद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नाव, आडनाव, आई-वडिलांचे नाव आदी माहितीत दुरुस्ती करायची असल्यासही त्याच मुदतीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे. शाळा स्तरावर क्षेत्र (शहरी/ग्रामीण) किंवा अभ्यासक्रमात बदल हवा असल्यास मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह विनंतीपत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर २७ मेपर्यंत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या आत गुणपडताळणीचा निर्णय शाळा लॉगिनवर दिसणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ६ लाख ५७ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९६.६१ टक्के म्हणजे ६ लाख ३४ हजार ९२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर आठवीसाठी ३ लाख ८७ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असता ९६.४७ टक्के म्हणजे ३ लाख ७३ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला.परीक्षा परिषदेने अंतरिम आणि अंतिम उत्तरसूची जाहीर करून निकाल प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध झाल्याने शाळा, शिक्षक आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
