दहावी-बारावी बोर्ड परीक्षा सोपी! स्वरुप बदलून प्रश्नपत्रिका ६०% कमी; मंडळाची अधिकृत माहिती 

बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रश्नपत्रिकांच्या छपाईवर बोर्डाला दरवर्षी तब्बल ३० कोटी रुपये खर्च करावे लागतात. विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक ताण आणि वाढता छपाई खर्च लक्षात घेऊन एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती.

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा सोपी! स्वरुप बदलून प्रश्नपत्रिका ६०% कमी; मंडळाची अधिकृत माहिती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या (10th and 12th Board Examinations) प्रश्नपत्रिकांमध्ये ऐतिहासिक बदल (Changes in Question Papers) करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या असलेल्या १० ते ११ पानांच्या प्रश्नपत्रिका पुढील काळात फक्त ३ ते ४ पानांच्या केल्या जाणार आहेत. यामुळे छपाई खर्चात सुमारे ६० टक्के बचत होऊन राज्याला दरवर्षी १८ कोटी रुपयांची बचत (Annual savings of 18 crore) होणार, असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. 

बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रश्नपत्रिकांच्या छपाईवर बोर्डाला दरवर्षी तब्बल ३० कोटी रुपये खर्च करावे लागतात. विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक ताण आणि वाढता छपाई खर्च लक्षात घेऊन एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन स्वरूपात प्रश्न अधिक स्पष्ट क्रमाने, गुण विभागणी स्पष्ट दाखवून आणि उपप्रश्न एकत्र ठेवून मांडले जातील. यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोपा वाटेल आणि वेळ व्यवस्थापनही सुकर होईल. 

ही सुधारणा येत्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील बोर्ड परीक्षांपासून लागू होणार आहे. केवळ खर्च बचतीपुरताच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा बदल फार महत्त्वाचा आहे. कागदाचा वापर लक्षणीयरीत्या कमी होईल, ज्यामुळे वृक्षसंवर्धनाला मदत होईल. तसेच उत्तरपत्रिकांशी छेडछाड, पुनर्मूल्यांकनातील गैरप्रकार आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायदा १९८२ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येत आहेत. नवीन दुरुस्तीनुसार हे प्रकार दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे ठरतील. यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त होईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. छोट्या पेपरमुळे मुलांचा ताण कमी होईल आणि ते अधिक चांगले लिहू शकतील, असे काही पालकांनी मत व्यक्त केले आहे. मात्र, काही शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांनी नवीन पॅटर्नच्या नमुना प्रश्नपत्रिका आणि मार्किंग स्कीम लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना तयारी करता येईल. बोर्ड अधिकृत अधिसूचना लवकरच जारी करणार असल्याचे सांगितले आहे.