आरटीई प्रवेशासाठी लाच घेतली;  शाळा संस्थापक अन् मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात अडकले 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क मागण्याची प्रवृत्ती अनेक खासगी शाळांमध्ये वाढत आहे. अशाच एका प्रकरणात करमाड येथील फिनिक्स इंग्रजी शाळेच्या संस्थापक आणि मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई  शाळेच्या आवारातच पार पडली.

आरटीई प्रवेशासाठी लाच घेतली;  शाळा संस्थापक अन् मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात अडकले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्या (RTE) अंतर्गत मोफत प्रवेश ( Free admission) मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क मागण्याची प्रवृत्ती अनेक खासगी शाळांमध्ये वाढत आहे. अशाच एका प्रकरणात करमाड (Private school Karmad) येथील फिनिक्स इंग्रजी शाळेच्या (Phoenix English School) संस्थापक आणि मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई  शाळेच्या आवारातच पार पडली. आरटीई नियमांनुसार कोणतेही शुल्क आकारता येत नसतानाही पालकांकडून पैशांची मागणी करून आर्थिक लूट (Financial exploitation parents) करणाऱ्या शाळांना आता धसका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे शाळेचे संस्थापक शिवाजी बाबासाहेब घुले (वय ४४) आणि मुख्याध्यापिका रेणुका रामनाथ कुबेर (वय ३८). एका ३५ वर्षीय पालकाने आपल्या मुलीचा आरटीई अंतर्गत या शाळेत प्रवेश घेतला होता. शासनाच्या नियमांनुसार अशा विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येत नाही. तरीही या दोघांनी वेगवेगळी कारण पुढे करत  पालकाकडे चार हजार रुपयांच्या मागणीसाठी तगादा लावला होता. पालकाच्या तक्रारीनंतर एसीबीने प्रकरणाची पडताळणी सुरू केली.

एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची खातरजमा केली. त्यानंतर शाळेतच सापळा रचण्यात आला. संस्थापक शिवाजी घुले यांनी पालकाकडून चार हजार रुपये स्वीकारतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतिभा आबुज यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

आरटीई प्रवेशानंतरही अनेक खासगी इंग्रजी आणि मराठी शाळा अ‍ॅक्टिव्हिटी किंवा इतर कारणांच्या नावाखाली पालकांकडून सर्रास पैसे वसूल करत आहेत. शिक्षण विभागाकडे तक्रारी जाऊनही ठोस कारवाई न झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच शाळांचे धाडस वाढत असल्याचा आरोप होत आहे. अशा प्रवृत्तीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.

या घटनेनंतर कोणत्याही शाळेकडून आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांकडून पैसे आकारले गेल्यास त्वरित एसीबीकडे रितसर तक्रार करा, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.