राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात
उत्सवादरम्यान विद्यार्थिनींनी सर्व शिक्षक व हॉस्टेल स्टाफ यांना स्वतः तयार केलेले 'बुकमार्क' आणि पेन देऊन गुरुपौर्णिमेच्या आपुलकीने शुभेच्छा दिल्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये परिपाठादरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे विशेष नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केले होते.
कार्यक्रमाप्रसंगी विचार मांडताना प्रशालेचे सिनियर मास्टर अद्वैत जगधने म्हणाले, "गुरु हा नेहमीच योग्य मार्ग दाखवणारा दीपस्तंभ असतो, त्यामुळे गुरुवर अढळ श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे." तसेच, भारतीय संस्कृतीतील गुरुपरंपरेचा धागा पकडत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांनी, "भारतीय संस्कृतीत आई, वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक हे सर्वच गुरुच्या भूमिकेत असतात. त्यांच्याकडून मिळणारे संस्कारच विद्यार्थ्यांना आयुष्यात घडवत असतात," असे प्रतिपादन केले.

या उत्सवादरम्यान विद्यार्थिनींनी सर्व शिक्षक व हॉस्टेल स्टाफ यांना स्वतः तयार केलेले 'बुकमार्क' आणि पेन देऊन गुरुपौर्णिमेच्या आपुलकीने शुभेच्छा दिल्या. याच प्रसंगी सर्व विद्यार्थिनींनी एकत्र येत 'पर्यावरण रक्षणा'ची भावूक प्रतिज्ञाही घेतली.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कॅडेट समीक्षा डफळ व कॅडेट समृद्धी मांजरे यांनी केले. यानंतर कॅडेट काश्वी निंबाळकर, कॅडेट अनन्या हरपळे व कॅडेट समृद्धी दौंडकर यांनी गुरुची महती सांगणारी सुंदर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी कॅडेट स्वराली देशमुख हिने उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर (निवृत्त) एव्हीएन एम. यज्ञरामन, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हॉस्टेल स्टाफ आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.