शाळेने दिलेल्या यादीप्रमाणे बाजारात पुस्तके मिळेनात; पालकांचा उडाला गोंधळ
अनेक शाळांकडून पालकांना बाजारातून कोणती पुस्तके आणावीत, याची यादीच देण्यात आली होती. परंतु,काही शाळांनी मागील वर्षापूर्वीची यादी जशीच्या तशी पालकांना दिली. त्यात इंटिग्रेटेड पुस्तकांचा उल्लेख होता. त्यामुळे अनेक पालक इंटिग्रेटेड पुस्तकेच द्यावेत, असा हट्ट धरून बसले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शाळा सुरू होण्यास काही दिवस बाकी असल्यामुळे विद्यार्थी व पालक पाठ्यपुस्तके व वह्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहे. परंतु, शाळेने दिलेल्या यादीनुसार बाजारात पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे पालकांचा गोंधळ उडाला आहे. काही पालक पुस्तक खरेदी न करताच घरी परतत आहेत. बालभारतीकडून चालू शैक्षणिक वर्षात सर्व विषयांसाठी स्वतंत्र पुस्तके छापण्यात आली. पूर्वी शिल्लक असलेली इंटिग्रेटेड पुस्तके आणि यावर्षी छापलेली सर्व विषयांसाठीची स्वतंत्र पुस्तके अशी दोन्ही प्रकारची पुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली . मात्र इंटिग्रेटेड पुस्तकांचा साठा लवकर संपल्यामुळे पालकांचा गोंधळ उडाला. पुस्तक विक्रेत्यांनी समजून सांगितल्यानंतरही अनेक पालक शाळेने दिलेल्या यादीनुसारच आम्हाला पुस्तके हवीत, असा हट्ट धरून बसल्याचे आढळून आले. यावर बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बालभारतीने यंदा इंटिग्रेटेड पुस्तकांची छपाई केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांसाठी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तकेच विकत घ्यावी लागणार आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार राज्यातील ssc बोर्डाच्या शाळा येत्या 16 जून रोजी सुरू होणार आहेत. त्यामुळे रविवारी सुट्टी असल्याने पालक आपल्या मुलांसाठी बाजारातून पुस्तके घेण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे दिसले. पुण्यातील आप्पा बळवंत चौकात पालक इयत्ता पहिली पासून बारावीपर्यंतची पुस्तके घेण्यासाठी दुकानासमोर रांगा लावून उभे होते. अनेक शाळांकडून पालकांना बाजारातून कोणती पुस्तके आणावीत, याची यादीच देण्यात आली होती. परंतु,काही शाळांनी मागील वर्षापूर्वीची यादी जशीच्या तशी पालकांना दिली. त्यात इंटिग्रेटेड पुस्तकांचा उल्लेख होता. त्यामुळे अनेक पालक इंटिग्रेटेड पुस्तकेच द्यावेत, असा हट्ट धरून बसले.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षी पाठ्यपुस्तकातून कोरी पाने वगळण्यात आली. तसेच एकत्रित अर्थात इंटिग्रेटेड पद्धतीने छापली जाणारी पुस्तके सुद्धा बंद करून स्वतंत्र विषयासाठी वेगवेगळे पुस्तक छापण्यात आले. बालभारतीकडे मागील वर्षाचा पुस्तकांचा साठा उपलब्ध होता.तसेच यावर्षी सुद्धा नव्याने छापण्यात आलेल्या पुस्तकांचा साठा सुद्धा बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आला. बालभारतीने पुस्तक छपाई संदर्भात पूर्वीच सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले होती. त्याचप्रमाणे काही प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा या संदर्भातील वृत्त छापून आले होते. मात्र ज्या पालकांना याबाबत कल्पना नव्हती, असे पालक शाळेने दिलेल्या यादीनुसारच आम्हाला पुस्तके द्यावेत, असा आग्रह पुस्तक विक्रेत्यांकडे धरत होते. त्यामुळे बाजारात पुस्तक खरेदी वरून काहीसा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
---------
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पूर्वी पाठ्यपुस्तकात कोरी पाने लावली जात होती. तसेच काही विषयांची पुस्तके इंटिग्रेटेड पद्धतीने छापली जात होती. परंतु यावर्षी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व विषयांसाठी स्वतंत्र पुस्तके छापली गेली तसेच त्यातून कोरी पाने वगळण्यात आले. जुना व नवीन साठा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होता. ज्या पद्धतीची पुस्तके बाजारात उपलब्ध आहे ती पुस्तके विद्यार्थ्यांनी वापरावीत.
कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती
-------------