राज्यातील शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी होणार; थेट शिक्षणमंत्र्यांनीच दिली ग्वाही
येणाऱ्या काळात शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणली जाणार असून, सर्व शालेय समिती एकत्रित करून एकच समिती कार्यरत ठेवण्याच्या विचाराधीन आहे. येणाऱ्या काळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची रांग मराठी शाळेत लागेल असे काम करा, असे आवाहनही मंत्री भुसे यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आगामी काळात राज्यातील शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी केली जाणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse) यांनी दिली आहे. इगतपूरी येथे राज्यभरातील आदर्श शिक्षकांच्या उपस्थितीत आयोजित एकदिवसीय शैक्षणिक विकास कार्यशाळेचे (Educational Development Workshop) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, येणाऱ्या काळात शिक्षकांची शाळाबाह्य कामे (Teachers' extracurricular activities) निम्म्यावर आणली जाणार असून, सर्व शालेय समिती एकत्रित करून एकच समिती कार्यरत ठेवण्याच्या विचाराधीन आहे. येणाऱ्या काळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची रांग मराठी शाळेत लागेल असे काम करा, असे आवाहनही मंत्री भुसे यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
उपस्थित आदर्श शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यशाळेची सुरुवात करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत शिक्षणक्षेत्रातील विविध बदलांवर चर्चा झाली. पूर्णवेळ उपस्थिती दाखवत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांच्या प्रयोगशील उपक्रमांची माहिती जाणून घेतली. कार्यशाळेसाठी राज्यभरातील आदर्श शिक्षकांचे ६ गट करण्यात आले होते. प्रत्येक गटात ६ शिक्षक सहभागी होते. या शिक्षकांनी आपल्या शाळेत काय बदल केले, कुठले नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले, याची माहिती दिली.
यावेळी आदर्श शिक्षकांनी देखील संशोधन व विचारविनिमय करून शिक्षण क्षेत्रात काय केले व येणाऱ्या काळात काय बदल अपेक्षित आहेत, याबाबत आपल्या भूमिका मांडल्या. शाळेत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आकर्षक वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुला-मुलींसाठी त्यांच्या प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृह, आकर्षक शालेय परिसर, प्रयोगशाळा इत्यादींचा समावेश होता. अनेक शाळा या लोकसहभागातून चांगल्या स्थितीत आहेत. तर बौद्धिकदृष्ट्या शिक्षकांनी जबाबदारी घेत पिढी घडविण्याचे काम केले असल्याचे मंत्री भुसे म्हणाले.
यावेळी भुसे यांनी सांगितले, शिक्षक हे शिक्षणव्यवस्थेचे खरे शिलेदार आहेत. यापुढे शाळाभेटी राज्यभर होणार असून या भेटी चूक काढण्यासाठी नव्हे, तर सुधारणा करण्यासाठी असतील. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबतही त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी शिक्षण विभाग ठामपणे उभे राहिले, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले.