नाटक हा समाज जीवनाचा आरसा : सतीश आळेकर
नाटकाला सुगीचे दिवस आले आहेत, लोकप्रिय नाटक करायचे की जास्त चांगले नाटक करायचे हे आता ठरवावे लागेल, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नाटक समाज जीवनाचा आरसा आहे. जे समाजात घडत असते त्याचे प्रतिबिंब नाटकात दिसत असते. परंतु, आजच्या नाटकातील समजूतदारपणा लोप पावत चालला आहे का ? असा प्रश्न पडतो. नाटकातून काय सांगायचे हे ठरवले पाहिजे. नाटकाला सुगीचे दिवस आले आहेत, लोकप्रिय नाटक करायचे की जास्त चांगले नाटक करायचे हे आता ठरवावे लागेल, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलावंत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आळेकर बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. विनयकुमार आचार्य, पंडित अतुल उपाध्ये, पंडित अतुल पराड, दिलीप देशपांडे, मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर, अंजली मोरे आदी उपस्थिती होते.
'जनस्थान' पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे माजी विद्यार्थी असणाऱ्या आळेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी नाट्यप्रेमी सदानंद आचवल यांच्या स्मृती निमित्त आयुष दुसावे या विद्यार्थ्याला नाट्य प्रेरणा आणि प्रत्युष महामुनी या विद्यार्थ्याला नाट्य आराधना पुरस्काराने गौरविण्यात आले.
सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन, चारुता प्रभूदेसाई यांनी प्रास्ताविक आणि रवींद्र सातपुते यांनी आभार प्रदर्शन केले