शाळेला दांडी माराल तर थेट बोर्डाच्या परीक्षेला मुकाल; 'सीबीएसई'चा मोठा निर्णय
नव्या नियमांनुसार डमी शाळांच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी नसेल. अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेची (एनआयओएस) परीक्षा द्यावी लागेल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सीबीएससी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) विद्यार्थ्यांसाठी सूचना दिल्या आहेत त्यानुसार, जे विद्यार्थी नियमितपणे वर्गात हजेरी लावणार नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी बोर्डाची परीक्षा देता येणार नाही असे सांगण्यात आले आहे. (Students who do not attend class regularly will not be able to appear for the Class 12th Board Examination.) याबरोबरच ज्या शाळा डमी शाळांच्या व्यवस्थेला प्रोत्साहन देतील किंवा गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नामांकित करतील त्यांच्याविरोधातही सक्त कारवाई केली जाणार असल्याचेही सीबीएसईने म्हटले आहे. (CBSE to bar students found enrolled in ‘dummy schools’)
सीबीएसई आपल्या परीक्षेबाबतच्या नियमावलीत बदल करण्याच्या विचारात आहे. नव्या नियमांनुसार डमी शाळांच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी नसेल. अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेची (एनआयओएस) परीक्षा द्यावी लागेल. जर एखादा विद्यार्थी तपासणीमध्ये अनुपस्थित असल्याचे दिसून आला किंवा तो नियमित वर्गांमध्ये जात नसेल तर त्याला बोर्डाची परीक्षा देण्यापासून रोखण्यात येईल, असे सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सीबीएसई गव्हर्निंग बोर्डाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यानुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी वर्गामध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. सीबीएसईच्या नियमानुसार केवळ नोंदणी केल्याने कुणी विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही. त्याच्यासाठी किमान ७५ टक्के उपस्थिती असायला हवी असे सीबीएसईच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, केवळ वैद्यकीय उपचार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांमधीळ सहभाग आणि इतर गंभीर कारणांसाठीच हजेरीमध्ये २५ टक्क्यांपर्यंत उपस्थितीमध्ये सवलत दिली जाणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी डमी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. ते वर्गात येत नाहीत आणि थेट बोर्डाच्या परीक्षेत बसतात. त्या अनुषंगाने बोर्डामार्फत या सूचना देण्यात आल्या आहेत.