जिच्या नावाने डॉ. पतंगरावांनी अनेक संस्था उभारल्या त्या ‘भारती’ गेल्या
घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले; तरी भारती या अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत नेहमीच मिळून मिसळून असत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या माजी वनमंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम (Former Forest Minister Dr. Patangrao Kadam) यांच्या कन्या भारती लाड (bharti laad) यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
भारती यांना 14 एप्रिल रोजी चक्कर आल्यासारखे झाले. त्यानंतर त्यांना सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी तातडीने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला. सांगलीतून हेलिकॉप्टरने पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांची किडनी निकामी झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, शक्य ते सगळे प्रयत्न करुनही सोमवारी दि . 28 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले,तरी भारती या अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत नेहमीच मिळून मिसळून असत. त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्था उभा राहिल्या. डॉ. पतंगराव कदम शिक्षणमहर्षी म्हणून घडण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पतंगरावांनी आपल्या सगळ्या संस्थांना 'भारती' हेच नाव दिले आहे. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.