चिंताजनक! शहादा समाज कल्याण वसतीगृहात ४० ते ५० विद्यार्थ्यांना विषबाधा; तीन जणांची प्रकृती चिंताजनक
घटनेची माहिती मिळताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यानंतर विषबाधित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली आणि पालकांशीही संवाद साधला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नंदुरबार जिल्ह्यातून एक चिंताजनक घटना समोर आली आहे. शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात (Social Welfare Department's Hostel) धक्कादायक घटना घडली आहे. जेवणानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा (40 to 50 students suffer from food poisoning) झाल्याची घटना समोर आली. जेवणानंतर अवघ्या १५ मिनिटांत विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास (Students suffering from vomiting and diarrhea) सुरू झाला. यातील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक (The students' condition is critical) असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यानंतर विषबाधित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली आणि पालकांशीही संवाद साधला. एकूण २५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नेहमीप्रमाणे डाळ-भात, शेवगा आणि चपाती असे जेवण देण्यात आले होते. जेवणानंतर काही मिनिटांतच त्रास सुरू झाला. पुढे असेही सांगण्यात आले आहे की, वसतीगृहातील ठेकेदार नियमितपणे निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत वसतीगृहातील जेवणाचे सॅम्पल आणि विद्यार्थ्यांच्या उलट्यांचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर नेमकी कारणे स्पष्ट होतील. या प्रकरणी पोलिसांनीही प्राथमिक माहिती घेतली असून, ठेकेदार आणि वसतीगृह व्यवस्थापनाकडून जबाब नोंदवण्यात येणार आहेत. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील समाज कल्याण वसतीगृहांच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सर्व विद्यार्थ्यांना चांगले उपचार मिळतील याची हमी दिली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पालक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. तपास सुरू असल्याने लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.