नाशिक उपकेंद्र: विद्यापीठातून कंपन्यांची निर्मिती व्हावी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला दुसरे कोणाचेही नाव असणार नाही, कोणाच्याही डोक्यातून दुसरे नाव आणू नये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र असेच नाव असेल इतर नाव देण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भविष्यात कोणत्या क्षेतात जॉब निर्माण होणार आहेत, याचा विचार करून विद्यापीठांनी नव नवे अभ्यासक्रम तयार करावेत. विविध विद्याशाखांचा अंतर्भाव असलेले सँडविच अभ्यासक्रम तयार करून त्यातून रोजगार निर्मिती करावी. जगातील विविध कंपन्या कोणत्या ना कोणत्या विद्यापीठात निर्माण झाल्या आहेत.विद्यापीठांनी इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून अधिक काम करावे आणि त्यातून कंपन्या निर्माण व्हाव्यात.नेक्स्ट इनोव्हेशन युनिकॉन हे विद्यापीठात कसे तयार होईल, याकडे लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ पराग काळकर, प्र. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, रविद्र शिंगणापूरकर, ज्योत्स्ना एकबोटे ,सागर वैद्य, नितीन घोरपडे, देविदास वायदंडे, संदीप पालवे,बागेश्री मंठाळकर, आदी यावेळी उपस्थित होते.
देवेद्र फडणवीस म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांचा व्याप मोठा आहे. त्यामुळे त्यांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला दुसरे कोणाचेही नाव असणार नाही, कोणाच्याही डोक्यात दुसरे नाव आणू नये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र असेच नाव उपकेंद्राला असेल इतर नाव देण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही.
शिक्षण आणि रोजगारी, शिक्षण उद्योग, सेवा, शेती, वेगळे असू शकत नाही. शिक्षण व्यवस्थेतून मानव संसाधन तयार झाले पाहिजे. आपण किती रोजगार निर्मिती करतो हे महत्वाचे आहे. ग्लोबली एम्लपॉयबल कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे. एआय आणि डेटा सायन्स महत्वाचे आहे. सुमारे ७० ते ८० रोजगाराचे स्वरूप बदलणार आहे. लर्न अन लर्न आणि रिलर्न अशी पद्धतीची महत्वाची आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एका जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ असावे, अशा पद्धतीने रचना केली जाईल.विद्यापीठाचे विकेंद्रीकरण केले जाईल.तसेच नाशिक येथील उपकेंद्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केलेकातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. एकल महिलांसाठी विशेष योजना राबवली जाणार आहे.
छगन भुजबळ म्हणाले, अनेक वर्ष नाशिकमध्ये उपकेंद झाले पाहिजे अशी मागणी केली जात होती. या गावातील सर्वांचे आभार मानतो कुठलाही नकार न देता जागा दिली. या उपकेंद्राचा खूप उपयोग होणार आहे. फुले दांपत्याचे नाव देशभर पसरले आहे. त्यामुळे या केंद्राला आणखी कोणाचे नाव देऊ नका? विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली. त्यावेळी अडचणी आल्या मी मंत्रीमंडळ बैठकीतून बाहेर गेलो होतो.
मुख्यमंत्री यांनी दरमहिन्याला नाशिकमध्ये रस्त्याने यावे. मुख्यमंत्री आपण रस्त्याने आलात त्यामुळे नाशिकमधील रस्त्याचे खड्डे बुजवले गेले आहेत. तुम्ही दरमहिन्याला यावे, अशी माझी विनंती आहे.इगतपुरीपासून नाशिकला येईपर्यंत शरीरातील हाडे खिळखिळी होतात.त्यामुळे तुम्ही दर महिन्याला यावे, असेही भुजबळ म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ सुरेश गोसावी म्हणाले, विद्यार्थी केवळ पदव्या घेणारे नको तर स्वयंसिद्धा व्हावे.यासाठी प्रयत्न केले जातील.तसेच वाईन टेक्नॉलॉजीवर अभ्यासक्रम आणि परकीय भाषा अभ्यासक्रम, डेटा सायन्स आणि लिबरल आर्ट यांनाही प्राधान्य देत आहोत. जग समजून घेणारा समाज समजून घेणारा विद्यार्थी हवा आहे. पुढील काळात उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात व्हावे, अशी दृष्टी आहे. तसेच शासनाने कर्मचारी भरतीचा आराखडा शासनाने मंजूर करून द्यावा, अशी विनंती केली.

रक्षाबंधना निमित्त व्यवस्थापन परिषद सदस्या ज्योत्स्ना एकबोटे,बागेश्री मंठाळकर, संगीता जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी आभार मानले.