'साहेब माझी FIR लिहून घ्या', हिंमत दाखवत चिमुकला मित्रासह थेट पोलीस ठाण्यात; पोलीसही झाले थक्क

हिंगणघाट येथील इयत्ता नववीच्या दोन विद्यार्थ्यांनी बस पास हरवल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना तक्रार नोंदवण्याच्या आणि नवीन पास मिळवण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

'साहेब माझी FIR लिहून घ्या', हिंमत दाखवत चिमुकला मित्रासह थेट पोलीस ठाण्यात; पोलीसही झाले थक्क

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जवळील परडा गावातील डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बस पास हरवल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले. नववीत शिकणाऱ्या समर्थ अनिल महाकाळकरचा विद्यार्थी बस पास हरवला होता. नवा पास मिळण्यासाठी अधिकृत पोलीस तक्रार आवश्यक असल्याचे कळताच त्याने वर्गमित्रासोबत हिंगणघाट पोलीस ठाणे गाठले. या बालकांच्या धाडसाने पोलीसही थक्क झाले.

ठाण्यात पोहोचल्यावर डायरी सांभाळणारे अंमलदार राकेश आष्टणकर यांच्या नजरेस गोंधळलेल्या अवस्थेतील ही दोन मुले पडली. त्यांनी जवळ बोलावून विचारपूस केली. तेव्हा मित्राने सांगितले की समर्थचा बस पास हरवला असून तक्रार केल्याशिवाय दुसरा पास मिळणार नाही. आष्टणकर यांनी घाबरू नका, असे धीर देत तक्रार कशी दाखल करायची हे समजावून सांगितले. त्यानंतर एसटी पास हरविल्याचा दाखला दिला आणि नवी पास काढण्याची संपूर्ण प्रक्रियाही सांगितली. हे सर्व आटोपताच दोघांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

बस स्थानक प्रमुख संजय शेडमाके यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने पास हरवल्याचे कळवले होते आणि पोलिसांना माहिती देण्याची सूचना केली होती. १९८८ च्या परिपत्रकानुसार विद्यार्थी असो वा एसटी कर्मचारी, पास हरवल्यास पोलीस तक्रार अनिवार्य असते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी मुलांचे कौतुक करताना म्हटले की, त्यांनी स्वतः संकट सांगितले आणि त्वरित निराकरण झाले. नागरिकांनीही घाबरून न राहता तक्रार दाखल करावी, जेणेकरून समस्या लवकर सुटू शकते.

या प्रसंगाने लहान मुलांमधील जागरूकता आणि आत्मविश्वास अधोरेखित झाला आहे. समर्थ आणि त्याच्या मित्राने भीती बाजूला सारून योग्य मार्ग अवलंबला. पोलिसांनीही सहकार्याने समस्या सोडवली. अशा घटनांमुळे समाजामध्ये कायद्याप्रती विश्वास वाढतो आणि लहानपणापासूनच योग्य प्रक्रिया समजून घेण्याचे महत्त्व पटते. ही घटना इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.