चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक परीक्षेसाठी 40 लाखांचा भाव, आमदाराचा आरोप
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा घेण्यात येत आहे या परीक्षा घेण्याच्या पद्धतीबद्दल अनेक उमेदवारांनी शंका व्यक्त केली आहे. जसे ४० गुंठ्याचा एक एकर होते, तसे एका जागेसाठी ४० लाखाचा भाव चालू आहे, असा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Chandrapur District Central Bank Recruitment) जाहिरात निघाली. त्याची २१, २२ आणि २३ डिसेंबर रोजी परीक्षा आहे. लिपिक पदासाठी २६१ आणि शिपाई पदासाठी ९७ अशा एकूण ३५८ जागांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. यासाठी राज्यातून ३१ हजार १५६ उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेले आहेत. यामधील गंभीर बाब अशी आहे. जी परीक्षा घेण्यात येत आहे या परीक्षा घेण्याच्या पद्धतीबद्दल अनेक उमेदवारांनी शंका व्यक्त केली आहे. जसे ४० गुंठ्याचा एक एकर होते, तसे एका जागेसाठी ४० लाखाचा भाव (Corruption in the recruitment process) चालू आहे, असा आरोप आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishore Jorgewar) यांनी विधानसभेत केला आहे. ही नोकर भरती झालीच पाहिजे परंतू ती पारदर्शकपणे झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३५८ जागांसाठी खुल्या पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीसाठी शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी परीक्षार्थी पेपर सोडवण्यात मग्न असताना अचानक तांत्रिक गोंधळामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली. अर्धा पेपर झाल्यानंतर अचानक पेपर पुढे ढकलल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घडलेल्या प्रकारामुळे परीक्षार्थींनी रोष व्यक्त केला आहे. हा पेपर २३ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे परीक्षार्थीना कळविण्यात आले आहे. बाहेरून आलेल्या उमेदवारांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था नसल्याने आता हा भुर्दंड कोणी सहन करायचा, असा सवाल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
अर्ज करताना परीक्षा केंद्र चंद्रपूर निर्धारित करण्यात आले होते. मात्र प्रवेशपत्र हातात येताच चंद्रपूरसह पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर, जालना, गोंदिया व अन्य जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आली. शनिवारी सकाळी १० वाजता परीक्षेला सुरुवात मात्र परीक्षार्थ्यांनी प्रश्न सोडवून उत्तर 'सीलेक्ट' केल्यानंतर 'सेव्ह अॅण्ड नेक्स्ट करताना ते उत्तर आपोआपच 'चेंज' होत होते. ही बाब परीक्षकाला सांगितल्यानंतर दहा मिनिटांसाठी परीक्षा थांबविण्यात आली आणि काही वेळातच तांत्रिक अडचण असल्याचे कारण देत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गदारोळ झाला.