BMC भरतीतील जाचक अटी मागे घेण्यासाठी आदित्य ठाकरेंचे आयुक्तांना पत्र
बृहन्मुंबई महानगरपालिकतर्फे कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये “पहिल्या प्रयत्नात पदवी" उत्तीर्ण असणे ही जाचक अट घातली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दोन दिवसांपुर्वी मुंबई महानगरपालिकेतील (Mumbai Municipal Corporation) 'कार्यकारी सहाय्यक' (Executive Assistant) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र यामध्ये नमूद अटींमध्ये काही अशा जाचक अटी (oppressive conditions) घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे २ ते ३ लाख उमेदवारांना या भरती परीक्षेचे अर्जच भरता येणार नाहीत. लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशा मागणीचे पत्र युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Commissioner Bhushan Gagrani) यांना लिहिले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकतर्फे कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये “पहिल्या प्रयत्नात पदवी" उत्तीर्ण असणे ही जाचक अट घातली आहे. या कारणास्तव महाराष्ट्रातील २ ते ३ लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्ज ही भरता येणार नाही व त्यांच्यासाठी ही अट अन्यायकारक आहे.
सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयावह प्रश्न पाहता आपण या अटीच्या पुनरावलोकनासाठी योग्य ती कारवाई करावी व या अटीत बदल करावा. जेणेकरून अधिकाधिक योग्य आणि सक्षम उमेदवारांना या पदासाठी संधी मिळेल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. अपेक्षा आहे की, आयुक्त या पत्राची दखल घेतील आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न समोर असलेल्या युवकांना अटी शिथिल करून दिलासा देतील, असे पत्र आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना लिहिले आहे.