CBSE : नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'त्रिभाषा सूत्र' लागू, २ भारतीय भाषा बंधनकारक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुभाषिक शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषांबद्दल आत्मीयता निर्माण होईल, भाषिक कौशल्ये विकसित होतील आणि सांस्कृतिक विविधतेची जाणीव वाढेल, असा विश्वास सीबीएसईने व्यक्त केला आहे.

CBSE : नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'त्रिभाषा सूत्र' लागू, २ भारतीय भाषा बंधनकारक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या (NEP) अंमलबजावणीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र लागू (Apply Tribhasha Sutra) करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदापासून, म्हणजे १ जुलै २०२६ पासून हा निर्णय सर्व सीबीएसई संलग्न शाळांमध्ये (CBSE-Affiliated School) अनिवार्य करण्यात येणार आहे.

नव्या नियमानुसार, विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असेल. त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, हिंदी, इंग्रजी आणि मराठी/संस्कृत/तमिळ/बंगाली अशा भारतीय भाषेचा समावेश असावा. सीबीएसईने यासंदर्भात सर्व संलग्न शाळांना सविस्तर परिपत्रक पाठवले असून, अभ्यासक्रम, वेळापत्रक आणि शिक्षक नियुक्ती याबाबत सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुभाषिक शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषांबद्दल आत्मीयता निर्माण होईल, भाषिक कौशल्ये विकसित होतील आणि सांस्कृतिक विविधतेची जाणीव वाढेल, असा विश्वास सीबीएसईने व्यक्त केला आहे. विद्यार्थी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सहजपणे विचार व्यक्त करू शकतील आणि त्यांची आकलन क्षमता वाढेल, असे अपेक्षित आहे.

हा निर्णय स्वागतार्ह असला तरी अनेक शाळांसमोर व्यावहारिक अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू सारख्या महानगरांतील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश सारख्या परदेशी भाषांना प्राधान्य देतात. आता भारतीय भाषांचे पुरेसे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करणे, वेळापत्रकात बदल करणे आणि अभ्यासक्रमाचे पुनर्नियोजन करणे ही मोठी जबाबदारी शाळांवर येणार आहे. महाराष्ट्रातील सीबीएसई शाळांमध्ये मराठी तिसरी भाषा म्हणून उपलब्ध असली तरी विद्यार्थ्यांकडून तिला तुलनेने कमी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. नव्या नियमामुळे मराठीसह अन्य भारतीय भाषांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बहुभाषिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संवाद कौशल्ये, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक समज वाढते. मात्र यासाठी शाळांकडे पुरेशा सुविधा आणि प्रशिक्षित शिक्षक असणे गरजेचे आहे. सीबीएसईने शाळांना या बदलासाठी तयारी करण्यास पुरेसा वेळ दिला असला तरी, अंमलबजावणीत कठोरता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.हा निर्णय विद्यार्थ्यांना जागतिक आणि भारतीय दोन्ही स्तरावर सक्षम बनवणारा ठरेल, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी नव्या नियमांची माहिती घेऊन शाळांशी समन्वय साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.