'ICAI'चा मोठा निर्णय! 'सीए'ची परीक्षा आता वर्षातून ३ ऐवजी फक्त २ वेळा होणार...
देशभरातील चार्टर्ड अकाउंटन्सीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सीए फायनल परीक्षेच्या पद्धतीत एक मोठा बदल केला आहे. ही परीक्षा वर्षातून तीन वेळा घेण्याऐवजी आता दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
देशभरातील चार्टर्ड अकाउंटन्सीची (CA) तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए फायनल परीक्षेच्या पद्धतीत (CA Exam Pattern 2026) एक मोठा बदल केला आहे. ही परीक्षा वर्षातून तीन वेळा (Three times a year) घेण्याऐवजी आता दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२६ च्या सत्रापासून लागू होणाऱ्या या नवीन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या संधींची संख्या कमी होईल. तर, सीए विद्यार्थ्यांना वर्षातून फक्त दोनदाच परीक्षा (Exams only twice a year) का देता येईल, हे आपण जाणून घेऊया.
यापूर्वी, सीए फायनल परीक्षा जानेवारी, मे आणि सप्टेंबरमध्ये घेतली जात असे, म्हणजेच विद्यार्थ्यांना वर्षातून तीन संधी मिळत होत्या. मात्र, नवीन निर्णयानुसार, ही परीक्षा आता फक्त मे आणि नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल. आयसीएआयने म्हटले आहे की, हा निर्णय विद्यार्थी आणि इतर संबंधित घटकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे घेण्यात आला आहे. या बदलाचा परिणाम फक्त सीए फायनल परीक्षेवर होईल. फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांसाठी सध्या कोणतेही बदल जाहीर करण्यात आलेले नाहीत. अभ्यासक्रम, उत्तीर्ण होण्याचे गुण, आर्टिकलशिप किंवा अभ्यासक्रमाच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, आयसीएआयने सीए इंटरमिजिएट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी ३ मे २०२६ रोजी होणारी ही परीक्षा आता ५ मे रोजी दुपारी २:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत घेतली जाईल. ग्रुप १ च्या परीक्षा ५, ७ आणि ९ मे रोजी, तर ग्रुप २ च्या परीक्षा ११, १३ आणि १५ मे रोजी घेण्यात येतील. सीएची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षातून तीन संधी मिळत होत्या, ज्यामुळे अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्वरित दुसरी संधी मिळवता येत होती. मात्र, आता ही संख्या ३ एवजी २ वर आणण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे विद्यार्थ्यांची एक संधी हिरावून घेतली आहे.
तज्ञांच्या मते, कमी संधींमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. शिवाय, परीक्षांची संख्या कमी झाल्यामुळे आयसीएआयसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आणि निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया सोपी होईल. यामुळे संपूर्ण परीक्षा प्रणाली अधिक मजबूत आणि प्रभावी होण्यास मदत होईल.