जनगणनेच्या कामावर असताना शिक्षिकेचा अपघाती मृत्यू; राज्यात आतापर्यंत ४ शिक्षकांचा बळी

सध्या शाळांना सुट्टी असताना शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी सक्तीने वापरण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत आहेत. भरउन्हात पायपीट, वाहतुकीचा धोका आणि कामाचा तणाव यामुळे शिक्षकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

जनगणनेच्या कामावर असताना शिक्षिकेचा अपघाती मृत्यू; राज्यात आतापर्यंत ४ शिक्षकांचा बळी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उन्हाळ्याच्या सुट्टीतही शाळा बंद असताना शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी (Census work) दारोदारी फिरावे लागत असल्याने शिक्षक वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. या कामादरम्यान मावळ तालुक्यातील एका महिला शिक्षिकेचा (Female Teacher) भीषण अपघातात मृत्यू (Death in an accident) झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यासह राज्यातील जनगणना कामी मृत्यू पावणाऱ्या शिक्षकांची संख्या चार झाली आहे. मृत शिक्षिकेचे नाव दीपाली तांबे असे आहे. त्या मावळ तालुक्यातील जनगणनेच्या शासकीय कामासाठी आपल्या दुचाकीवरून जात असताना जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक (Collision with a Two-Wheeler) दिली. अपघात इतका भीषण होता की, दीपाली तांबे यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. शिक्षक संघटनांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशीही शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी बोलावणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, शिक्षिकांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल शिक्षकांकडून करण्यात येत आहे. तसेच महामार्गावर डंपरसारख्या भारी वाहनांच्या भरधाव वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी जनगणना काम करताना राज्यातील तीन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे भगवान पाटील (कोल्हापूर), राजाराम ढोले (सांगोला) आणि सुंदरम वांगसकर (लातूर) अशी या शिक्षकांची नावे आहेत. 

या घटनांमुळे शिक्षक वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, कुटुंबीय आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कोल्हापुरातील खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघने या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यामध्ये काही मागण्या करण्यात आल्या आहेत. जनगणनेचे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीत घ्यावे, अशी मागणी केली आहे. 

सध्या शाळांना सुट्टी असताना शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी सक्तीने वापरण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत आहेत. भरउन्हात पायपीट, वाहतुकीचा धोका आणि कामाचा तणाव यामुळे शिक्षकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अपघातग्रस्त कुटुंबीयांना त्वरित मदत करावी आणि उर्वरित जनगणना काम पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.