बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेतकरी पुत्राची कादंबरी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

अॅड. राहुल रासवे हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात वकिली करतात. वकिलीच्या व्यस्त दिनक्रमातही त्यांनी साहित्य साधने केली. कुठलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना अवघ्या २८ व्या वर्षी त्यांच्या कादंबरीला नामांकित विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळणे ही केवळ व्यक्तिगत यशाची बाब नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रातील प्रतिभेची विजयगाथा आहे.

बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेतकरी पुत्राची कादंबरी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गुन्हेगारीच्या बातम्यांमुळे वारंवार नकारात्मक चर्चेत राहणाऱ्या बीड जिल्ह्यासाठी (Beed News) अभिमानाची बातमी समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव या ग्रामीण भागातील शेतकरी पुत्र अॅड. राहुल रासवे (Adv. Rahul Rasve) यांची ‘शिवराय आणि संविधान’ ही कादंबरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) यू.जी. मराठी तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात (Third-Year Marathi Syllabus) समाविष्ट करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ही कादंबरी विद्यार्थ्यांना शिकवली जाणार असून, ग्रामीण भागातील एका युवकाच्या साहित्यिक यशाने (literary success) संपूर्ण बीड जिल्हा अभिमानाने नतमस्तक झाला आहे.

अॅड. राहुल रासवे हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात वकिली करतात. वकिलीच्या व्यस्त दिनक्रमातही त्यांनी साहित्य साधने केली. कुठलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना अवघ्या २८ व्या वर्षी त्यांच्या कादंबरीला नामांकित विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळणे ही केवळ व्यक्तिगत यशाची बाब नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रातील प्रतिभेची विजयगाथा आहे. खरात आडगावसारख्या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राहुल यांच्या या यशाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे.

‘शिवराय आणि संविधान’ ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेशी भारतीय संविधानातील लोकशाही, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा सुंदर मेळ साधते. इतिहास, राज्यशास्त्र आणि संविधान यांचा अनोखा समन्वय साधणारी ही कादंबरी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, साहित्यिक आस्वाद आणि संविधानिक मूल्यांची जाणीव विकसित करण्यास मदत करणार आहे. ग्रामीण जीवन, संघर्ष आणि राष्ट्रप्रेम यांचा मेळ घालणाऱ्या या लेखनाने विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीचे लक्ष वेधले.

या यशाबद्दल अॅड. राहुल रासवे म्हणाले, “कुठलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या नामांकित विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात माझ्या कादंबरीचा समावेश होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे.” माजलगाव तालुक्यातील नागरिक, साहित्यप्रेमी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी राहुल रासवे यांचे या यशामुळे भरभरून कौतूक केले आहे. बीड जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुन्हेगारीच्या छायेत असलेल्या जिल्ह्याला साहित्यिक यशाने सकारात्मक ओळख मिळाली आहे. राहुल रासवे यांचा हा प्रवास ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.