११ वी प्रवेशाचा अडथळा दूर; दहावीच्या छापील गुणपत्रकांच्या वाटपाला सुरुवात

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची छापील गुणपत्रके, तपशीलवार गुणनोंदी आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे वितरित करण्यात आली.

११ वी प्रवेशाचा अडथळा दूर; दहावीच्या छापील गुणपत्रकांच्या वाटपाला सुरुवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावी (SSC) परीक्षा २०२६ उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या छापील गुणपत्रिका, (Distribution of Printed Marksheets) उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या वितरणाला सुरुवात (Distribution Begins) करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत (11th Admission Process) मूळ गुणपत्रिकांअभावी निर्माण झालेला मोठा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची छापील गुणपत्रके, तपशीलवार गुणनोंदी आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे वितरित करण्यात आली. त्यानंतर संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ८ मे २०२६ रोजी जाहीर झाला होता. निकालानंतर विद्यार्थ्यांना तात्पुरती ऑनलाइन गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, अकरावी प्रवेशासाठी अनेक ठिकाणी मूळ किंवा छापील गुणपत्रिकेची आवश्यकता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता छापील गुणपत्रिकांचे वितरण सुरू झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र बोर्डाने यंदापासून गुणपत्रक आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या दस्तऐवजावर विद्यार्थ्यांचा फोटो आणि QR कोडही समाविष्ट करण्यात आला असून त्याद्वारे कागदपत्रांची डिजिटल पडताळणी करणे अधिक सोपे होणार आहे. यामुळे बनावट प्रमाणपत्रांना आळा बसण्यास मदत होईल, असा बोर्डाचा दावा आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांशी संपर्क साधून मूळ गुणपत्रिका व प्रमाणपत्रे ताब्यात घ्यावीत तसेच त्यावरील नाव, जन्मतारीख, विषयवार गुण आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. अकरावी प्रवेशाच्या पुढील टप्प्यांसाठी ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.