शंभर टक्के प्राध्यापक भरती,CHB मानधन वाढीसाठी प्राध्यापक संघटनेचे पुन्हा आंदोलन
मार्च 2025 पर्यंतच्या सर्व रिक्त जागांवर शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे सीएचबी धारक प्राध्यापकांच्या मानधनात प्रति तास/तासिका दीड हजार रुपयांपर्यंत वाढ करावी.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील प्राध्यापक भरतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली असून महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने येत्या 15 सप्टेंबर पासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 100 टक्के प्राध्यापक भरती (100 percent professor recruitment)करावी. त्याचप्रमाणे सीएचबी धारक प्राध्यापकांच्या मानधनात प्रती तास/ तासिका दीड हजार रुपयांपर्यंत वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे,असे नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर (President Dr. Sandeep Pathrikar)यांनी सांगितले.
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे एन ए पी अंमलबजावणीत अनेक अडचणी येत असल्याचे प्राध्यापक संघटनेकडून सांगितले जात आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापक भरती संदर्भात घोषणा केली असली तरी अद्याप त्याबाबत शासन स्तरावरून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च 2025 पर्यंतच्या सर्व रिक्त जागांवर शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे सीएचबी धारक प्राध्यापकांच्या मानधनात प्रति तास/तासिका दीड हजार रुपयांपर्यंत वाढ करावी. त्याचप्रमाणे 11 महिन्यांसाठी नियुक्ती देऊन किमान 45 हजार रुपये महिना मानधन मिळावे,या मागणीसाठी नवप्राध्यापक संघटना आंदोलन करणार आहे.
डॉ. संदीप पाथ्रीकर म्हणाले, महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेतर्फे हे आंदोलन पात्रता धारकांच्या हितासाठी व अंधारमय वाटत असलेल्या भविष्यकाळासाठी केले जात आहे. पात्रता धारकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा,सरकारने त्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यावेत,उच्च शिक्षणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि भ्रष्टाचाराला तात्काळ वायबंद घालावा, सीएसबी धारक प्राध्यापकांच्या मागण्यासंदर्भात टाळाटाळ न करता धोरणात्मक निर्णय घ्यावा, यासाठी संघटनेने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर विभागात शिक्षकेतर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला असून त्याप्रकरणी कारवाई झाली.मात्र केवळ कोल्हापूर विभागाच नाही तर राज्यातील सर्व सहसंचालक कार्यालयातील चौकशी करावी.त्याच प्रमाणे घोटाळेबाज अधिकारी यांना पुन्हा नियुक्ती देऊ नका,अशीही आमची मागणी आहे,असेही संदीप पाथ्रीकर म्हणाले.