आश्रमशाळेत दुसरीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा मृत्यू, अधीक्षिकेसह तिघांचे निलंबन

नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आरोग्यसेवा, देखरेख आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आदिवासी आश्रमशाळांबाबत चिंता वाढली आहे.

आश्रमशाळेत दुसरीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा मृत्यू, अधीक्षिकेसह तिघांचे निलंबन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आदिवासी आश्रमशाळांमधील व्यवस्थापनातील कमतरता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे राज्यभरात चिंता व्यक्त होत आहे. कळवणजवळील विसापूर येथील आश्रमशाळेत शुक्रवारी पहाटे दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या आठ वर्षीय सृष्टी सूर्यवंशी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीला गेल्या दोन दिवसांपासून ताप येत होता. प्राथमिक उपचारानंतर तिला पुन्हा शाळेत आणण्यात आले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ताप वाढून प्रकृती खालावल्याने तिला कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रात्री अडीच वाजता डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

या घटनाक्रमाने मुलीच्या वडिलांसह नातलगांमध्ये संताप व्यक्त झाला. त्यांनी जिल्हा रुग्णालयात आंदोलन करून हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. आश्रमशाळेतील वसतिगृह अधीक्षिका स्मिता गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी भगवान निकम आणि मुख्याध्यापक जिभाऊ पवार यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या तिघांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सखोल चौकशीसाठी प्रकल्प स्तरावर समिती नेमण्यात आली असल्याची माहिती आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीपाडा आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीने काथवडपाडा येथील राहत्या घरी आत्महत्या केली. हरसूल पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. आदिवासी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या आश्रमशाळांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याने पालक आणि सामाजिक कार्यकर्ते नाराज आहेत.

या प्रकरणांमुळे आश्रमशाळांमधील आरोग्य सुविधा, पर्यवेक्षण आणि आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने तातडीने चौकशी पूर्ण करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी विविध क्षेत्रांतून होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आता अपरिहार्य बनले आहे.