आदिवासी वसतीगृहात प्रेग्नेंसी टेस्ट, लैंगिक शोषण यासह असंख्य तक्रारींचा विद्यार्थिनींनी वाचला पाढा...
नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृहांमध्ये लैंगिक शोषण, गर्भधारणा चाचण्या, अपुऱ्या सुविधा आणि दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर येथे मेळघाट, चंद्रपूर, रामटेक, देवरी, माहुर, किनवट, गोंदिया व भंडारा या भागांतून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनींनी वसतिगृहांमधील भीषण परिस्थिती उघडकीस आणली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासमोर त्यांनी विविध तक्रारी मांडून सरकारवर दबाव निर्माण करण्याची विनंती केली. विद्यार्थिनींनी प्रेग्नेंसी टेस्ट, लैंगिक शोषण, अपुऱ्या सुविधा, तक्रारींकडे दुर्लक्ष आणि धमकावण्याच्या घटनांचा उल्लेख करत तातडीने दखल घेण्याची मागणी केली. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थिनींनी आपली व्यथा मोकळेपणाने सांगितली, ज्यामुळे आदिवासी मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काही विद्यार्थिनींनी वसतिगृहांमध्ये लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याचा आरोप केला. सुट्टीवरून घरी गेल्यानंतर परत आलेल्या मुलींची गर्भधारणा चाचणी केली जात असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. एका विद्यार्थिनीने आश्रमशाळेत मुलींच्या लैंगिक शोषणाची तक्रार केली, तर दुसऱ्याने वसतिगृहातील मुलींवर बाहेरील व्यक्तींकडून अत्याचार होत असल्याचे सांगितले. अशा प्रकरणांमध्ये गरीब आदिवासी तरुणांना आरोपी ठरवून कारवाई केली जात असल्याचा आरोपही समोर आला. खापरी येथील वसतिगृहात मध्य प्रदेशातून आलेल्या एका विद्यार्थिनीच्या शोषणाच्या तक्रारीकडे पोलीस प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करीत असल्याचेही एका विद्यार्थिनीने सांगितले.

राज्यातील अनेक आदिवासी वसतिगृहे खासगी इमारतींमध्ये चालविली जात असून तेथे प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाहीत. एका विद्यार्थिनीने २५० मुलींसाठी केवळ तीन स्वच्छतागृहे असल्याचे सांगितले, तर एका आश्रमशाळेत ७५ मुलींसाठी फक्त दोन संगणक उपलब्ध असल्याची माहिती दिली. काही वसतिगृहांमध्ये मेसची व्यवस्था नसल्याने विद्यार्थिनींना बाहेरून डबा मागवावा लागतो. दुपारी डबा उशिरा येत असल्याने शाळा संपल्यानंतर रात्री तेच खाऊन झोपावे लागते, अशी तक्रारही करण्यात आली. या सर्व तक्रारींमुळे आदिवासी मुलींच्या शिक्षणावर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. सरकारने तातडीने दखल घेऊन वसतिगृहांमध्ये सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता सुविधा व भोजनाची योग्य आणि सुनिश्चित व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले. अभिजीत दीपके यांच्यासमोर मांडलेल्या या तक्रारींनी आदिवासी विद्यार्थिनींच्या समस्यांना व्यापक स्वरूप दिले आहे. आता प्रशासन काय पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे.