एमपीएससी राज्यसेवा २०२५ मुलाखती प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलल्या; विद्यार्थ्यांना दिलासा

एमपीएससीने २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान नियोजित राज्य सेवा २०२५ च्या मुलाखती पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या चिंता लक्षात घेऊन सुधारित तारखांची घोषणा स्वतंत्रपणे केली जाईल.

एमपीएससी राज्यसेवा २०२५ मुलाखती प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलल्या; विद्यार्थ्यांना दिलासा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा २०२५ च्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संशय आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केले की, २१ ते २४ तसेच २६ आणि २८ सप्टेंबर या कालावधीत नियोजित असलेला मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही आयोगाने नमूद केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील द्विधा मनःस्थिती दूर झाली आहे.

प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घेण्याची मागणी कायम ठेवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फेरतपासणी होईपर्यंत मुलाखती थांबविण्याची ग्वाही दिली होती. मात्र अधिकृत परिपत्रक न आल्याने २१ ते २८ सप्टेंबर दरम्यानच्या मुलाखतींबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मुलाखतीची तयारी करावी की मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवावा, असा प्रश्न अनेकांना पडला होता. आयोगाच्या ताज्या निर्णयाने हा प्रश्न तात्पुरता सुटला आहे.

राज्यसेवा २०२५ च्या मुलाखतींचा मुद्दा निकाली निघाला असला, तरी तीन ऑक्टोबर ते एक नोव्हेंबरदरम्यान नियोजित असलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत अद्याप स्पष्टता नाही. परीक्षेचे प्रश्नपत्रिके सामान्यतः दोन महिने आधीच तयार केले जातात. आयोगाचे निलंबित अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या वादग्रस्त कार्यकाळातच आगामी मुख्य परीक्षेचे पेपर तयार झाल्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संशय कायम आहे. त्यामुळे या प्रक्रियेतही गैरप्रकार झाले नसतील याची खात्री हवी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

एमपीएससीने मुलाखती पुढे ढकलून विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा दिला असला, तरी मुख्य परीक्षा २०२६ च्या सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांची चिंता कायम आहे. नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घेण्याची मागणी जोर धरत असताना आयोगाने याबाबत लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आता सुधारित मुलाखत वेळापत्रकाची वाट पाहत तयारी सुरू ठेवली आहे. या निर्णयामुळे परीक्षेच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे.