सारथी व टीआरटीआय परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे काय ?
शासनाने सामान धोरणाच्या नावाखाली संस्थांच्या कार्यपध्दतीत विषमता आणली आहे.यामुळे विद्यार्थ्यामध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य शासनाने बार्टी, सारथी, महाज्योती (Barty, Sarathi, Mahajyoti)आदी संस्थांमध्ये समान धोरण राबवण्याबाबत अध्यादेश काढला.मात्र,त्यानुसार अद्याप अंमलबजावणी केली जात नाही. ओबीसी व एससी घटकातील विद्यार्थ्याच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, अद्याप सारथीतर्फे मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी व टीआरटीआयच्या वतीने आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली नाही.त्यामुळे या संस्थांच्या माध्यमातून परदेशी शिष्यवृत्तीसाठी (Foreign Scholarship) अर्ज केव्हा स्वीकारले जाणार? असा सवाल स्टुडंट हेल्पिंग हँडस संस्थेचे कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे.
आंबेकर म्हणाले, सारथी संस्थेतर्फे मागील वर्षापासुन परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. सारथीतर्फे या योजजनेंतर्गत 75विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर करण्यात आले.मात्र गेल्या वर्षी केवळ 21 विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. त्यातच या योजनेला सुद्धा 75 टक्के गुणांची अटी ठेवण्यात आली. त्याच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला.तसेच शैक्षणिक शुल्कला मर्यादा असल्याने ही योजना फक्त नावापुरती आहे का ? असे प्रश्न पडत आहे.
आदिवासी प्रशिक्षण व संशोधन विभागामार्फत 40 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात अनास्था दिसून येत आहे. या योजनेसाठी 2013 पासून अर्ज येत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यावर प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे या विभागाला कोणीच वाली नाही का ? असा सवालही आंबेकर यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने सामान धोरणाच्या नावाखाली संस्थांच्या कार्यपध्दतीत विषमता आणली आहे.यामुळे विद्यार्थ्यामध्ये कमालीची अस्वस्थता आहे.एकाच वेळी सर्व संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करून शासनाने सर्वांचे अर्ज एकाचवेळी स्वीकारण्यास सुरूवात का केली नाही,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.