UPSC CSE प्रिलिम्स २०२६: विद्यार्थ्यांचा प्रचंड संताप; ‘पेपर अवघड नव्हे, तर नशिबावर अवलंबून’
कोचिंग संस्था आणि तज्ज्ञांनीही या पेपरला ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वात अनपेक्षित आणि कठीण’ असे म्हटले आहे. पेपर ५६ पानांचा लांब होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचा प्रचंड दबाव निर्माण झाला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSc) सिव्हिल सेवा प्रिलिम्स परीक्षा २०२६ नंतर (Civil Services Preliminary Examination 2026) विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आणि निराशा (Anger and Frustration Among Students) पसरली आहे. २४ मे २०२६ रोजी झालेल्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी GS पेपर १ ला ‘फक्त अवघड नव्हे तर अत्यंत अनिश्चित आणि नशिबावर अवलंबून’ असे म्हटले आहे. परीक्षा केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांचे चेहरे हताश दिसत होते. ज्या प्रकारचा प्रिलीम्सचा पेपर काढला गेला, त्यानुसार कट ऑफ खूप खाली जाण्याची चिंता अनेक विद्यार्थांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या मते, अत्यंत लांबलचक, विश्लेषणात्मक आणि गोंधळात टाकणारे प्रश्न टाकण्यात आले होते. पारंपरिक स्थिर भाग कमी होता आणि अपेक्षेपेक्षा जास्त अनपेक्षित, दुर्मिळ तथ्ये आणि बहुपदरी प्रश्न विचारले गेले. इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि चालू घडामोडींमधील प्रश्न नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आले. अनेक उमेदवार म्हणतात की, "दोन पर्याय जवळजवळ सारखेच वाटत होते, काय निवडावे हे नशिबावरच अवलंबून होते." सीएसएटी मध्ये संख्यात्मक अभियोग्यता याचे प्रश्न खुप कठीण होते.
कोचिंग संस्था आणि तज्ज्ञांनीही या पेपरला ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वात अनपेक्षित आणि कठीण’ असे म्हटले आहे. पेपर ५६ पानांचा लांब होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचा प्रचंड दबाव निर्माण झाला. एका प्रश्नासाठी साधारण 1 मिनीट 20 सेकंद्र मिळतात, मात्र GS 1 मध्ये एवढे लांबलचक प्रश्न विचारण्यात आले ज्यांना वाचायलाच साधारण मनुष्याला 3-4 मिनीट लागतील, असे प्रश्न परीक्षेत आले होते. चुकीचे पर्याय काढून टाकण्याची पद्धतही यावेळी फारशी उपयोगी पडली नाही. यामुळे कट-ऑफ ७० ते ८० गुणांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोशल माध्यमांवर हजारो पोस्ट्समध्ये विद्यार्थी आपली निराशा व्यक्त करत आहेत. "यूपीएससी परीक्षा ही नशिबावर अवलंबून आहे", "मानसिकदृष्ट्या थकवणारी", "आत्मविश्वास खचवणारी", असे शब्द वारंवार वापरले जात आहेत. हा आपला शेवटचा प्रयत्न असल्याचे काही विद्यार्थी बोलत आहेत. संघ लोकसेवा आयोगाने अद्याप उत्तरतालिका जाहीर केलेली नाही.
ही चर्चा फक्त सोशल मिडियापुरती मर्यादित नसून यूपीएससी परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उभी करणारी ठरत आहे. ज्ञानापेक्षा नशीब आणि मानसिक सहनशक्ती जास्त महत्त्वाची का?, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. अशा पेपरद्वारे खऱ्या प्रशासकीय क्षमता तपासल्या जातात, असे आयोगाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये आशा आणि निराशेचा खेळ सुरूच राहील.