डोमा आश्रमशाळेतील कथित ‘भूतबाधे’चे सावट अखेर दूर; अंनिसच्या प्रबोधनानंतर विद्यार्थिनी पुन्हा शाळेच्या वाटेवर

सुट्टीच्या काळात मुलींनी ‘कांचना २’ सारखे हॉरर चित्रपट पाहिले होते. हॉस्टेलमधील चर्चेमुळे या भीतीदायक प्रतिमांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. आजारपण किंवा मानसिक त्रासावर वैद्यकीय उपचारांऐवजी स्थानिक ‘भूमका’कडे जाण्याच्या प्रवृत्तीमुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळाले.

डोमा आश्रमशाळेतील कथित ‘भूतबाधे’चे सावट अखेर दूर; अंनिसच्या प्रबोधनानंतर विद्यार्थिनी पुन्हा शाळेच्या वाटेवर
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मेळघाट परिसरातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी पसरलेली कथित ‘भूतबाधे’ची भीती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) तत्पर हस्तक्षेपाने आणि सातत्यपूर्ण प्रबोधनानंतर अखेर दूर झाली आहे. भयभीत होऊन शाळा सोडलेल्या विद्यार्थिनींमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण झाला असून, पालकांनीही मुलींना लवकरच शाळेत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन १० ऑगस्ट रोजी अंनिसच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकारी नंदिनी जाधव (पुणे), प्रा. प्रवीण देशमुख (मुंबई) आणि रामभाऊ डोंगरे (नागपूर) यांनी डोमा आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट दिली. मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पथकाने मुलींच्या मनातील भीती घालवण्यासाठी स्वतः रात्री आश्रमशाळेतच मुक्काम केला.पथकाने ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान एकताई, चुनखडी, पाचडोंगरी, खडीमल आणि बुटीदा या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन विद्यार्थिनी व पालकांशी संवाद साधला. या पाहणीतून काही प्रमुख कारणे समोर आली.
 सुरुवातीला एका मुलीला झालेल्या त्रासानंतर भीतीपोटी इतर मुलींमध्येही असंबद्ध बोलणे व हातवारे करण्यासारख्या प्रतिक्रिया पसरल्या. सुट्टीच्या काळात मुलींनी ‘कांचना २’ सारखे हॉरर चित्रपट पाहिले होते. हॉस्टेलमधील चर्चेमुळे या भीतीदायक प्रतिमांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. आजारपण किंवा मानसिक त्रासावर वैद्यकीय उपचारांऐवजी स्थानिक ‘भूमका’कडे जाण्याच्या प्रवृत्तीमुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळाले.
"मुलींच्या घरभेटीदरम्यान त्या पूर्णपणे स्वस्थ असल्याचे दिसून आले. प्रबोधनानंतर आता त्या स्वतः मनमोकळेपणाने बोलत असून शाळेत परत जाण्यास उत्सुक आहेत," अशी माहिती नंदिनी जाधव यांनी दिली. तसेच, परिसरातील आश्रमशाळांमध्ये जेवण आणि राहण्याच्या असुविधा असून त्यामध्ये प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

"अंधश्रद्धा केवळ अज्ञानातून नव्हे, तर भीती व परंपरेतून जन्म घेते; त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रबोधन गरजेचे आहे," असे प्रतिपादन प्रा. प्रवीण देशमुख व रामभाऊ डोंगरे यांनी केले.
अंनिसच्या या संवेदनशील मोहिमेमुळे ओस पडलेली डोमा आश्रमशाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने फुलण्यासाठी सज्ज झाली आहे.