व्यवस्थापन परिषद सदस्यच विद्यापीठ कामकाजावर नाराज; थेट राज्यपाल व मंत्र्यांना पत्र
वादग्रस्त ठराव मंजूर करून घेतल्याचे दाखवून सभागृहाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप वैद्य यांनी केला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य (management council member Sagar Vaidya) यांनी विद्यापीठाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत शनिवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत लेटर बॉम्ब टाकला. अहमदनगर व नाशिक उपकेंद्रच्या (Ahmednagar and Nashik sub-centres) उभारणीबाबत दुजाभाव दाखवला जात असून व्यवस्थापन परिषदेच्या ठरावांना केराची टोपली दाखवत विद्यापीठ कायद्याचा भंग होत आहे.तसेच विरोध केलेले वादग्रस्त ठराव मंजूर करून घेतल्याचे दाखवून सभागृहाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप वैद्य यांनी केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. नेहमीपेक्षा ही बैठक वादळी ठरली. सागर वैद्य यांनी विद्यापीठातील विविध विभागांच्या कामकाजावर ताशेरे ओढत तीव्र नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) फेब्रुवारी महिन्यात
विद्यापीठ कामासंदर्भातील अनेक फाईल्स अनेक महिने प्रलंबित राहत आहेत. कॅस, प्राध्यापक भरती, नेट सेट स्क्रुटीनी, प्रमाद समिती सह अनेक समितीचे विषय 3-4 महिने होऊनही प्रलंबित राहतात. तसेच अनेक प्रकारची कामे करून घेण्याची विद्यापीठातील ठेकेदारी देण्याची पद्धत सदोष आहे. बिल्डिंग वर्क कमिटीच्याच्या बैठका नियमित घेतल्या जात नाही. जेव्हा झाल्या, त्या तहकूब करून त्याचे मिनिट्स ही दिले जात नाही.ऐनवेळी मुदतवाढीचे ठराव आणून काही ठराविक ठेकेदार पोसण्याचा उद्योग विद्यापीठात सुरू असल्याचा गंभीर आरोपही वैद्य यांनी केला.
विद्यार्थी संघटनांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसओपीच्या माध्यमातूनही विद्यापीठातील लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय. संघटना नको,आंदोलन नको, चळवळ, उत्सव काहीच नको, गैरप्रकारांवर कुणाचा आवाज नको. काही ठराविक लोकांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मर्जीनुसार विद्यापीठ चालवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. खाजगी विद्यापीठ करून या दैदिप्यमान वारसा असलेल्या संस्थेला खाजगी संस्थेत रूपांतरित करायचे आहे का...? सवालही त्यांनी पत्राद्वारे उपस्थित केला. तसेच भविष्यात यात सुधारणा झाली नाही तर नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही सागर वैद्य यांनी दिला.