शिक्षकाचे भरदिवसा अपहरण; पोलिसांकडून अवघ्या पाच तासांत सुखरूप सुटका

एक अनोळखी महिला व तीन इसमांनी शिक्षकाला विनाकारण मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी शिक्षकांना जबरदस्तीने ईको कंपनीच्या व्हॅनमध्ये कोंबून अपहरण करून अज्ञात स्थळी नेले. ही घटना भरदिवसा घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शिक्षकाचे भरदिवसा अपहरण; पोलिसांकडून अवघ्या पाच तासांत सुखरूप सुटका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv Crime News) भूम शहरात शिक्षकाचा भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या (Abduction of a Teacher) घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, भूम पोलीस आणि विशेष भरारी पथकाने (Special Flying Squad) अवघ्या पाच तासांत अपहरण झालेल्या शिक्षकाची सुखरूप सुटका (Teacher Safely Rescued) करत धडाकेबाज कारवाई केली. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भूम शहरातील कुसुमनगर भागात राहणारे आणि व्यवसायाने शिक्षक असलेले शिवाजी आगले (वय ५४ वर्षे) हे २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२३ वाजण्याच्या सुमारास भूम येथील पोस्ट ऑफिससमोर होते. यावेळी एक अनोळखी महिला व तीन इसमांनी त्यांना विनाकारण मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी शिक्षकांना जबरदस्तीने ईको कंपनीच्या व्हॅनमध्ये कोंबून अपहरण करून अज्ञात स्थळी नेले. ही घटना भरदिवसा घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी अपहरण झालेल्या शिक्षकाच्या पत्नी शितल ओगले (वय ५४, शिक्षिका, रा. कुसुमनगर, भूम) यांनी दुपारी ४.१६ वाजता भूम पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, अपहरणकर्त्यांच्या व्हॅनचा मागोवा आणि संशयित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली. बीड जिल्ह्यात शोधमोहीम राबवताना अवघ्या पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना अपहरण झालेले शिक्षक शिवाजी ओगले यांचा शोध लागला आणि त्यांची आरोपींच्या तावडीतून सुरक्षित सुटका करण्यात आली.

या धाडसी कारवाईत भूम पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय दाखवला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. अपहरणामागील नेमका हेतू काय होता, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने शहरातील संवेदनशील ठिकाणी गस्त आणि सीसीटीव्ही नेटवर्क वाढवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.