TET पेपर 1.5 कोटीला विकणार होते; पेपर फुटीत दिल्ली कनेक्शन समोर, तिघे अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना दीड कोटी रूपयांना पेपर विकायचा होता. प्रश्नपत्रिकेचे चार सेट विकण्यासाठी आणले होते. गोपनीय बातमीदारकडून पोलिसांना ही माहिती मिळाली होती. शिक्षकांनाकडून विविध रक्कमा घेऊन हे पेपर विकण्याचा त्यांचा डाव होता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 18 जून रोजी घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.भिवंडीतील कोणगाव येथे या प्रकरणी तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हे तिघे पेपर विकण्यासाठी दिल्ली येथून मुंबईत आले होते. त्यातील एक आरोपी हरियाणा येथील असून दोन आरोपी बिहार येथील आहेत.पोलिसांनी ट्रॅप लावून आरोपींना पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना दीड कोटी रूपयांना पेपर विकायचा होता. प्रश्नपत्रिकेचे चार सेट विकण्यासाठी आणले होते. गोपनीय बातमीदारकडून पोलिसांना ही माहिती मिळाली होती. शिक्षकांनाकडून विविध रक्कमा घेऊन हे पेपर विकण्याचा त्यांचा डाव होता. पोलीस तपासात कोचिंग सेंटरच्या सहभागाची शक्यता गृहीत धरली आहे. यात सध्या केलेल्या प्राथमिक तपासात शिक्षण विभागातील अधिकारी आढळून आले नाही. मात्र, सर्व शक्यता आम्ही तपासणार आहोत, असेही पोलिसांनी सांगितले.
पेपर फुटीमध्ये कोण सहभागी आहेत याचा तपास सुरू असून यामध्ये मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. यासर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
राज्यातील 6 लाख 125 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. सर्व यंत्रणा यासाठी कामाला लावण्यात आल्या होत्या. मात्र पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रक्रियेत सर्व गोपनीय बाबी विचारात घेतल्या गेल्या नाहीत, असे बोलले जात आहे. पेपर महाराष्टातील भिवंडी कोणगाव येथे फुटला असला तरी प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातून मिळाल्या की दिल्लीतून आणल्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे पोलीस तपासातून आणखी काय? समोर येणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.