NCERT ने नववीच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावनाच वगळली, नव्या वादाची ठिणगी
नव्या पाठ्यपुस्तकात ‘लोकशाही आणि तुम्ही’ या विभागात संविधान निर्मिती, लोकशाही संस्था आणि मूलभूत हक्कांवर चर्चा करण्यात आली आहे. मात्र, प्रस्तावनेतील ‘सार्वभौम’, ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’, ‘लोकशाही’ आणि ‘प्रजासत्ताक’ या महत्त्वाच्या संकल्पनांचा उल्लेख टाळण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एनसीईआरटीने (NCERT) इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात महत्त्वाचे बदल (Changes to the 9th class book) केले आहेत. यामध्ये संविधानाच्या प्रस्तावनेला (Preamble to the Constitution) पूर्णपणे वगळण्यात आले असून, ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्दही काढून टाकण्यात आले आहेत. त्याचवेळी मतदार यादी सुधारणा कार्यक्रम (SIR) आणि आणीबाणीवर नवीन धडा समाविष्ट करण्यात आला आहे. या बदलांमुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात नव्या वादाची (Controversy over exclusion) ठिणगी पडली आहे.
नव्या पाठ्यपुस्तकात ‘लोकशाही आणि तुम्ही’ या विभागात संविधान निर्मिती, लोकशाही संस्था आणि मूलभूत हक्कांवर चर्चा करण्यात आली आहे. मात्र, प्रस्तावनेतील ‘सार्वभौम’, ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’, ‘लोकशाही’ आणि ‘प्रजासत्ताक’ या महत्त्वाच्या संकल्पनांचा उल्लेख टाळण्यात आला आहे. पुस्तकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेवर सविस्तर प्रकाश टाकला असून, त्यांनी विद्यार्थी आणि जनतेला संघटित करून बिहार व गुजरातमध्ये केलेल्या जनआंदोलनांचा उल्लेख केला आहे. १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधी सरकारचा पराभव झाल्याचे लोकशाहीच्या सामर्थ्याचे उदाहरण म्हणून दाखवले आहे.
पाठ्यपुस्तकात १९७५ च्या आणीबाणीचे वर्णन करताना इंदिरा गांधी सरकारविरोधात वाढत असलेला जनअसंतोष, बेरोजगारी, महागाई आणि गैरव्यवस्थापन यांचा उल्लेख आहे. आणीबाणीदरम्यान मूलभूत हक्क निलंबित करणे, पत्रकारांवर निर्बंध आणि राजकीय नेत्यांच्या अटकांचा उल्लेख करून लोकशाही संस्थांवर झालेला दबाव अधोरेखित केला आहे. याशिवाय, खोट्या बातम्या, माहितीची दुष्प्रचार, गरिबी, सामाजिक भेदभाव आणि लैंगिक असमानता यांसारख्या लोकशाहीसमोरील आव्हानांवरही स्वतंत्र चर्चा करण्यात आली आहे.
एनसीईआरटीने वैदिक काळातील स्त्रियांच्या स्थिती स्पष्ट करण्यासाठी मनुस्मृतीतील एक श्लोक समाविष्ट केला आहे. पुस्तकात नमूद केले आहे की, वैदिक काळात स्त्रियांना सन्माननीय स्थान होते. त्या शिक्षण घेत असत, धार्मिक विधींमध्ये सहभागी होत असत आणि सार्वजनिक सभांना उपस्थित राहत असत. ऋग्वेदातील अनेक स्त्री ऋषींचा उल्लेख करत स्त्रियांच्या सामाजिक दर्जात नंतर कालांतराने झालेला बदलही दर्शवण्यात आला आहे.
पाठ्यपुस्तकात भारतीय निवडणूक आयोगाची मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली आहे. २०२४ मध्ये ९६.८ कोटींहून अधिक मतदारांसह जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेचे आयोजन करणे हे आव्हानात्मक कार्य असल्याचे अधोरेखित केले आहे. SIR द्वारे मतदार यादी अद्ययावत करणे आणि चुका दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेचाही विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला आहे.