TET परीक्षेचा निकाल पालिका निवडणुक निकालापूर्वी;अंतिम उत्तरसूची आठवड्याभरात
मागील वर्षाच्या तुलनेत परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उत्तर सूचीवर प्राप्त आक्षेपामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. एकाच प्रश्नाबाबत सुमारे शंभर- शंभर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतिम निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) अंतरिम (तात्पूर्ती)उत्तर सूची जाहीर झाल्यानंतर त्यावर आक्षेप मागविण्यात आले.सुमारे अडीच ते तीन हजार आक्षेप परीक्षा परिषदेकडे प्राप्त झाले असून त्यावर निर्णय घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात टीईटी परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर होण्याची शक्यता असून TET चा निकाल पालिका निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केला जाईल,असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची अंतरिमउत्तर सूची 19 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या उत्तर सूचीवर 27 डिसेंबर 2025 पर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन या दोन्ही पेपर संदर्भातील आक्षेप परीक्षा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उत्तर सूचीवर प्राप्त आक्षेपामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. एकाच प्रश्नाबाबत सुमारे शंभर- शंभर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.
पुढील टीईटी परीक्षा केव्हा होणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांना सुद्धा टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळेच या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत यंदा चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले. त्यातच आदिवासी विभागाने नुकताच अध्यादेश प्रसिद्ध केला असून सेवेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना 1 सप्टेंबर 2017 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून येत्या जून जुलै 2026 महिन्यात पुन्हा एकदा टीईटी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे जे उमेदवार नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतील त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
शिक्षक भरतीच्या दृष्टीने टीईटी परीक्षा आवश्यक आहे. त्यातच आता शिक्षक भरतीचे काम राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेकडील जबाबदारी चांगलीच वाढली आहे.