TAIT परीक्षेचा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार; कोणाचा निकाल ठेवणार राखून?

संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किंवा नाही, याची खात्री केल्यानंतरच या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिलेले विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

TAIT परीक्षेचा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार; कोणाचा निकाल ठेवणार राखून?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Council Of Examination) घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-3) परीक्षेचा निकाल (Exam Result)केव्हा जाहीर होणार याबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.मात्र, ही उत्सुकता अधिक काला ताणली जाणार नाही. कारण (TAIT-3) परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण झाली असून येत्या सोमवारी 30 जून रोजी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात TAIT  परीक्षेचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

जून महिन्यात घेण्यात आलेल्या TAIT-3 या परीक्षेसाठी 2 लाख 28 हजार 880 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा दिली. TAIT-3 परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली असल्याने निकाल लवकर जाहीर करणे शक्य झाले आहे. शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. TAIT परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येते. त्यामुळे शिक्षण विभागाने TAIT परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा,अशी अपेक्षा उमेदवारांकाडून केली जात होती.त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे. 

द्वितीय वर्ष शिक्षणशास्त्र अर्थात डीएड अभ्यासक्रमास असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा TAIT परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार परीक्षा परिषदेने परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती. अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन TAIT परीक्षा दिली.मात्र, संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किंवा नाही, याची खात्री केल्यानंतरच या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिलेले विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो,असेही सूत्रांनी सांगितले.