विद्यार्थीच काॅलेजला येत नाहीत, शिकवावे कोणाला?  प्राध्यापकाची अधिसभेत खंत 

मा‍झ्या १४ वर्षांच्या अध्यापन कार्यकाळात मला १०० ताससुद्धा विद्यार्थ्यांच्या अभावी घेता आले नाहीत, अशी खंत अधिसभा सदस्याने बैठकीत मांडली. एका बाजूला प्राध्यापक नसल्याच्या आणि असले तरी ते शिकवत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून समोर येत असतात. मात्र, याला मराठवाडा विद्यापीठ अपवाद ठरले आहे. 

विद्यार्थीच काॅलेजला येत नाहीत, शिकवावे कोणाला?  प्राध्यापकाची अधिसभेत खंत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) संलग्न असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी वर्गात येत नाहीत. मा‍झ्या १४ वर्षांच्या अध्यापन कार्यकाळात मला १०० तास सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभावी घेता आले नाहीत, अशी खंत एका अधिसभा सदस्याने बैठकीत (University Adhisabha Meeting) मांडली. एका बाजूला प्राध्यापक नसल्याच्या आणि असले तरी ते शिकवत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून समोर येत असतात. मात्र, यात मराठवाडा विद्यापीठातून वेगळीच माहिती समोर आली आहे.

विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. तरीही विद्यापीठांसह महाविद्यालये सुरू आहेत. हे फक्त भारतातच होऊ शकते, असा टोलाही या प्राध्यापकाने मारला. अधिसभेत अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासण्यासह इतर कामांवरून जोरदार खडाजंगी झाली. विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात पार पडली. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांच्यासह अधिसभा सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

अधिसभा सदस्य डॉ. भास्कर साठे यांनी चालू शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील विभागांमध्ये प्रवेश कमी झाल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर डॉ. उमाकांत राठोड यांनी उच्च शिक्षणातील भीषण वास्तवच मांडले. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये २ टक्के विद्यार्थीही दररोज महाविद्यालयात येत नाहीत. तेव्हा प्राध्यापकांनी शिकवायचे कोणाला, असा सवाल उपस्थित केला. तेथे परवानगी घेण्यापुरतेच प्राध्यापक नेमतात. त्यानंतर विनाअनुदानित महाविद्यालयांत काहीच नसते, असेही त्यांनी सांगितले. त्यावर प्रा. सुनील मगरे यांनी आक्षेप नोंदवला.

सरसकट विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये काहीच होत नाही, हा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले, ज्या महाविद्यालयांत काहीच होत नाही, त्यांची नावे जाहीर करण्याचे आवाहन केले. अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक तीन-तीन लाख रुपये पगार घेतात व महाविद्यालयात जाऊन डबे खाऊन परत येतात. विद्यार्थी महाविद्यालयात येत नाहीत, हे प्राध्यापकांचे अपयश असल्याचेही प्रा. मगरे यांनी सांगितले. त्यावर दोन्ही बाजूंकडून जोरदार आक्षेप घेण्यात आले.