सरकार मुलांच्या बुध्दीचा खून करतय; रमेश पानसे यांची हिंदी वरील वादावर घणाघाती टीका
सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय गंभीर गोष्ट आहे. ही लहान मुलांच्या दृष्टीने लहान मुलांचे खच्चीकरण करणारी आहे. लहान मुलांना एकही भाषा नीट येऊ न देणारी आहे. हे सरकारला आणि सरकारच्या वतीने ज्यांनी निर्णय घेतले. त्यांना यात लहान मुलांचे मोठे नुकसान होत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
"सरकारने हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा मुद्दा हा अत्यंत थिल्लरपणे व बालिशपणे हाताळला आहे. सुरूवातीला निर्णय घेतला जातो. मग या निर्णयाला स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले जाते. तसेच थेट शाळा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत तो स्थगित ठेवला जातो.यांचा सर्व समाजाने असा अर्थ घेतला की आता हिंदीची कटकट राहिली नाही.आता हिंदी भाषा पहिली पासून शिकायची नाही. त्यातही शाळेचा पहिली दिवश म्हणजेच प्रवेश उत्सव होऊ दिला जातो.त्यानंतर रात्री उशीरा हिंदी विषयासंदर्भातील अध्यादेश काढला जातो. याचा अर्थ सरकार मुलांच्या बुध्दीचा खून करत आहे" अशी घणाघाती टीका जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केली. तसेच हिंदीच काय सध्या पहिलीपासून शिकवली जाणारी इंग्रजी सुध्दा बंद करावी,अशी भूमिका पानसे यांनी व्यक्त केली.
शालेय शिक्षण विभागाने त्री-भाषा सूत्रावर प्रसिध्द केलेल्या अध्यादेशावरून शैक्षणिक ,साहित्यिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.त्यानिमित्त 'एज्युवार्ता' शी संवाद साधताना जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे म्हणाले, ही घटना वरवर दिसते तेवढी सोपी नाही. सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय गंभीर गोष्ट आहे. ही लहान मुलांच्या दृष्टीने लहान मुलांचे खच्चीकरण करणारी आहे. लहान मुलांना एकही भाषा नीट येऊ न देणारी आहे. हे सरकारला आणि सरकारच्या वतीने ज्यांनी निर्णय घेतले. त्यांना यात लहान मुलांचे मोठे नुकसान होत आहे. हे काळात नाही का? जर हे कळत असेल तर हे मराठी मुलांचे खच्चीकरण करत आहेत. जेणे करून मराठी शाळा बंद होऊन इंग्रजी शाळा वाढाव्यात यासाठी हा निर्णय घेतला जात आहे,असा आरोप करावा लागेल.
मुळात जेव्हा केवळ मराठी विषय पहिली ते चौथीपर्यंत होता तेव्हा विद्यार्थी मराठी उत्तम शिकत होते आणि मराठी विषयात विद्यार्थी उत्तीर्णही होत होते. सुमारे 25 वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रजी विषय शिकवण्यास सुरूवात केली तेव्हा विद्यार्थी मराठी बरोबर इंग्रजीतही नापास होऊ लागली. कारणं एकच वेळी दोन भाषा शिकणे हे विद्यार्थ्यांच्या मेंदूला पेलवत नाही.त्यांच्या मेंदूला त्याचे ओझे होते. आता हिंदी सुरू केली मराठी अधिक कच्ची राहील इंग्रजी कच्ची होईल आणि हिंदी सुध्दा पक्की शिकली जाणार नाही म्हणजे तीन कच्च्या भाषा घेऊन विद्यार्थी पुढे जातील. परिणामी विद्यार्थ्यांचे भविष्य मारले जाईल, ही त्यातील गंभीरता आहे. तसेच ही गंभीरता राजकीय लोकांना कळतेच असे नाही.
पानसे म्हणाले, आपल्या देशात असे कुठेही नाही, अगदी गुजरातमध्ये सुध्दा नाही; हे राज ठाकरे यांनी दाखवून दिले. गुजरामध्ये दोन भाषा आहेत. मग महाराष्ट्रातच तीन भाषा का? मग हा आग्रह कोणाचा आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील आपल्याला काडीचही काही कळत नाही हे राज्यकर्त्यांनी मान्य करायला हवे. कारण असे निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. माझ्या जन्मापासून त्री- भाषा सूत्र आहे. टप्प्या टप्प्याने भाषा शिकल्या की त्या उत्तमपणे शिकता येतात. जास्त काळ शिकल्यावर त्या अधिक चांगल्या येतात हा गैरसमज आहे. पहिली भाषा नीटपणे यायला लागली की ती दुसरी भाषा शिकण्याचे साधन होते. पूर्वी पाचवी व सातवीपासून हिंदी व इंग्रजी भाषा शिकवल्या जाता होत्या. त्यामुळे कोणाचेही वाटोळे झाले नाही.तसेच हिंदी विषयावर केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकटे का बोलत आहेत, इतर उपमुख्यमंत्री व मंत्री का बोलत नाहीत,असा सवालही पानसे यांनी उपस्थित केला.