प्राध्यापक भरती युद्ध पातळीवर; सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनातही वाढ करणार: चंद्रकांत पाटील

पुढील नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांवरील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरूंबरोबर प्राध्यापक भरतीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.

प्राध्यापक भरती युद्ध पातळीवर; सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनातही वाढ करणार: चंद्रकांत पाटील

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे साडेसहाशे प्राध्यापकांच्या जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार असून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये 5 हजार 500  प्राध्यापकांच्या जागा सुद्धा युद्ध पातळीवर भरल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे या जागा भरल्यानंतर CHB प्राध्यापकांची फारशी आवश्यकता भासणार नाही.परंतु,पुढील काळात सीएसबी प्राध्यापकांच्या मानधनात 900 वरून 1,200 रुपयांपर्यंत वाढ केली जाईल, असे माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितली.

उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडींबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पाटील बोलत होते. विद्यापीठांकडून प्राध्यापक भरती संदर्भातील वेळापत्रकच तयार करून घेण्यात आले असून त्यानुसार विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापक भरती युध्दपातीळवर केली जाणार आहे. 

पाटील म्हणाले, प्राध्यापक भरतीबाबत अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला असून भरती संदर्भातील नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण विभागातर्फे भरतीबाबत आवश्यक कार्यवाही केली जात आहे. पुढील नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांवरील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरूंबरोबर प्राध्यापक भरतीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.

तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र 900 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत मानधन वाढ करण्यासंदर्भात पुढील काळात निर्णय घेतला जाईल. तसेच सुमारे 5 हजार 500 प्राध्यापकांची पदे भरल्यानंतर तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या पदांची फारशी आवश्यकता भासेल,असे वाटत नाही. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.