बाटू विद्यापीठाशी महाविद्यालयांचे संलग्नीकरण थांबणार; कॅम्पस युनिव्हर्सिटी पुरते मर्यादित राहणार
बाटू विद्यापीठ केवळ कॅम्पस विद्यापीठ म्हणूनच राहील, त्यात वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातील. बटूची विविध ठिकाणी असणारी उपकेंद्रे बंद केले जातील,असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
लोणारे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अर्थात बाटू विद्यापीठाशी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना संलग्निकरण घेणे बंधनकारक होते.मात्र, राज्य शासनातर्फे आता या महाविद्यालयांना दुसऱ्या विद्यापीठांशी संलग्नित होण्याची मुभा दिली जाणार आहे. तसेच बाटु विद्यापीठ हे या पुढील काळात केवळ कॅम्पस युनिव्हर्सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे,असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडले होते. त्यामुळेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांना तडका फडकी राजीनामा द्यावा लागला. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी हे विद्यापीठ केवळ कॅम्पस विद्यापीठ म्हणूनच राहील, त्यात वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातील. बटूची विविध ठिकाणी असणारी उपकेंद्रे बंद केले जातील,असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकालात बाटू विद्यापीठाशी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये संलग्नित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील महाविद्यालयांना बाटू विद्यापीठ हे खूप लांब पडत होते. आपल्या जिल्ह्याजवळील विद्यापीठाशी संलग्निकरण असल्यास परीक्षा व इतर प्रशासकीय कामकाज करणे महाविद्यालयांना सोयीचे ठरते. त्यामुळे अनेक वेळा व्यावसायिक अभ्यासक्रमांना आपल्या जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलगणीकरण मिळावे अशी मागणी केली जात होती. आता लवकरच त्यात सुधारणा केली जाणार असून त्या संदर्भातील ऑर्डनन्स काढला जाणार आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, परीक्षा व इतर कारणांमुळे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी राजीनामा दिला. मात्र संलगणीकरणाबाबतही अनेक महाविद्यालयांना अडचणी येत आहेत. त्यामुळे बाटू विद्यापीठाशी असणारे संलग्नीकरण काढून घेण्याबाबत महाविद्यालयांना मुभा दिली जाणार आहे. पूर्वी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना केवळ बाटू विद्यापीठाशी संलग्निकरण घ्यावे लागत होते. मात्र आता ही अट काढून टाकली जाईल. तसेच या विद्यापीठात विविध व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जाते. त्यामुळे हे विद्यापीठ केवळ कॅम्पस विद्यापीठ म्हणूनच सुरू राहील.