शिक्षक पदभरती, संचमान्यतेचे वेळापत्रक ठरले; शाळांकडे उरले फक्त आठ दिवस
शासनाकडून प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी "आधार" वैध विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे. आधार वैधतेची कार्यवाही पुर्ण झालेली नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शाळांच्या संचमान्यतेसाठी आधार वैध (Aadhar Updation) विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे. पण तांत्रिक घोळामुळे ही प्रक्रिया रखडली असून ३० एप्रिलची मुदतही उलटून गेली आहे. शिक्षण विभागाने (Education Department) अंतिम संचमान्यतेसाठी तारीख निश्चित केली असून त्यानंतर शिक्षक पदभरती (Teachers Recruitment) सुरू होणार आहे. त्याचे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
कोविड-१९ (Covid 19) च्या पार्श्वभुमीवर २०१९-२० पासून शाळांच्या संच मान्यता जैसे थे ठेवण्यात आलेल्या होत्या. आता कोविड-१९ नंतर झालेले विद्यार्थ्याचे स्थलांतर परिस्थितीतील बदल इत्यादी बाबी विचारात घेवून शासनाकडून प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी "आधार" वैध विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे. सद्यस्थितीत आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. आधार वैधतेची कार्यवाही पुर्ण झालेली नाही, अशी विद्यार्थी वैधतेची कार्यवाही शाळास्तरावर सुरु आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता १५ मे पर्यंत अंतिम करण्याचे नियोजन आहे.
अंतिम झालेल्या संच मान्यतांतील मंजूर पदांनुसार पदभरतीची कार्यवाही केली जाईल. ज्या ज्या व्यवस्थापनांकडून संच मान्यता २०२२-२३ ची कार्यवाही अंतीम होईल, त्या त्या व्यवस्थापनांनी त्यांच्याकडील शिक्षक पदांची बिंदुनामावली प्रमाणित करून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांचे जाहिरात देणे आवश्यक आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार संच मान्यता अंतिम करुन संच मान्यतेचे शाळानिहाय वितरण करण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी २० मेपर्यंत निश्चित करण्यात आला आहे.
संच मान्यता अंतिम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदु नामावली प्रमाणित करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्याचे नियोजन आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांची १५ जुलैपर्यंत (पहिल्या तिमाहीसाठी) पोर्टलवर नोंद करावी लागेल. पहिल्या तिमाहीसाठी प्राप्त जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे इत्यादी बाबी २० ऑगस्टपर्यंत पोर्टलमार्फत करण्याचे नियोजित आहे. दरम्यानच्या काळात दुसऱ्या तिमाहीकरीता शिक्षकांच्या रिक्त पदांची नोंद केली जाईल.
हेही वाचा : आयटीआय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; मंत्री लोढा यांच्याकडून विद्यावेतनाची घोषणा
अशी आहे शिक्षक पदांची सध्यस्थिती
मागील शिक्षक पदभरतीतील जाहिरातीतील १२ हजार ७० पैकी मुलाखतीशिवाय पदभरतीमध्ये ५ हजार ९७० उमेदवारांची शिफारस झालेली आहे. मुलाखतीसह पदभरतीमध्ये १ हजार ९३३ रिक्त पदांसाठी शिफारस झालेली असून एकुण ७ हजार ९०३ रिक्त पदभरतीची कार्यवाही झालेली आहे. सध्यस्थितीत १९६ व्यवस्थापनांना एसईबीसी आरक्षणामुळे निवड प्रक्रिया पुर्ण न झालेल्या व्यवस्थापनाची निवड प्रक्रिया अंतीम टप्यात असून व्यवस्थापनांना मुलाखतीसाठी मे महिन्यात उमेदवार उपलब्ध होणार आहेत. यातुन ७६९ रिक्त पदे भरली जातील. तसेच समांतर आरक्षणातील उमेदवारांना संधी देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्यांमुळे रिक्त राहिलेल्या पदांसाठी उमेदवारांना शिफारस करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थातील अंदाजे ७५० रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.