थोर महापुरुषांच्या विचारांचे व कार्याचे आचरण करा: डॉ. सुधाकर जाधवर
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
घटनाकार, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, दलितांचे कैवारी, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेचे सदस्य व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर यांनी उलगडला. तसेच थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खारा, असे म्हणत थोर महापुरुषांच्या विचारांचे व कार्याचे आचरण करावे, असे आवाहनही जाधवर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन , राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ' डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चिंतन व भारतीय समाज' या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ.सुधाकर जाधवर बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.सुधाकर बोकेफोडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.अभिजीत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जाधवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महापरीनिर्माण दिनापर्यंतच्या विविध घटना प्रसंगावर प्रकाश टाकला. तसेच समाजातील सर्वसामान्य व्यक्तीसाठी, विविध जाती धर्मातील माणसांसाठी आणि भारतीय राज्यघटना लिहून संपूर्ण देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची उपस्थित माहिती दिली. तसेच काळाराम मंदिर, चवदार तळ्याचा सत्याग्रह, पुणेकरार अशा विविध घटना प्रसंगांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडरांचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिंतन आणि त्यांची भारतीय समाज व्यवस्थेबद्दल असणारी भूमिका यावर जाधवर यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. सुधाकर बोकेफोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अनेक पुस्तकांचे लेखन व वाचन केले.वाचनाने माणूस विचार प्रवृत्त होतो.त्यामुळे प्रत्येकाने वाचन करायला हवे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या समितीवर मला काम करण्याची संधी मिळाली. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक ग्रंथांची पुन्हा छपाई करता आली. तसेच विविध ग्रंथांचे भाषांतर करता आले.हे सर्व ग्रंथ शासनाने मोफत उपलब्ध करून दिले आहेत.त्याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा.
कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी अध्यक्षीय भाषण केले. अभिजीत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
eduvarta@gmail.com